” एक गाव एक गणपती ” ही अखंड परंपरा जपणारं पनवेल तालुक्यातील रिटघर हे एक आदर्श गावं.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि ४ सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातच कोकणात अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे ” गणेश चतुर्थी ” महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात करून सार्वजनिक गणेश उत्सवाला सामाजिक आणि व्यापक रूप देण्याचं काम टिळकांनी त्या काळात केलं.आणि आज पण तिच परंपरा तोच उत्साह आणि व्यापकता जपणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गावं आपली परंपरा जपताना दिसतात.त्यातलचं एक गाव एक गणपती ही ४८ वर्षांची अखंड परंपरा जपणारं रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रिटघर हे एक आदर्श गाव गावं तसं लहान पण कीर्ती महान असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही.सन १९७४ या साली रिटघर गावाच्या ग्रामस्थांनी पहिल्यांदा आपल्या गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना सर्व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने सत्यात उतरवत त्याच वर्षांपासून आपल्या गावातील हनुमान मंदिरात सर्व गावाच्या वतीनं एक गणपती बसविण्यात आला.आणि एक आदर्शवत सुरुवात केली ती ह्या रिटघर गावाने.

स्व. ह.प.भ.भागोजी महाराज सांगडे, स्व.पांडुरंग महाराज परळी वैजनाथ, स्व.ह.प.भ. बाळू भोपी महाराज,स्व.धोंडू भोपी, शंकर भोपी,स्व.मुंगा पाटील कै. पुंडलिक शंकर भोपी कै.पांडुरंग सदु भोपी ह्या सर्व मंडळींनी जी आत्ता हयात नाहीत आणि सोबतच बाळाराम पाटील,किसन पाटील,गणूबुवा भोपी,रामभाऊ भगत ,विठ्ठल भोपी,सुभाष शेठ भोपी, गणु जयराम भगत, गोपीनाथ शेठ भोपी, धर्मा बुवा भोपी ह्या मंडळींच्या पुढाकारातून आणि सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीतून या उत्सवाच्या माध्यमातून गावात आनंद प्राप्त व्हावा एक आदर्श निर्माण व्हावा , याच उद्देशाने एक गाव एक गणपती ही परंपरा जपली गेली आणि खऱ्या अर्थाने अनावश्यक खर्चाला फाटा देत आपल्या समाज बांधवांना आणि खास करून तरुणांना एकत्रित करत समाज बांधणीची परंपरा ही याच मांडणीतून सुरू झाली.

आज साऱ्या पंचक्रोशी सह संपूर्ण तालुक्यात आपल्या कार्याने आदर्श निर्माण करणारा एक गाव एक गणपती उत्सव साजरा करणारा रिटघर गाव हा कोणतंही कार्यक्रम असो, मंडळाची, ग्रामस्थांची एकजूट ही प्रशंसनीय असतो.आनंदही मोठा असतो.सर्वांच्या मध्ये उत्साह हा भरलेला असतो गावातील अबाल- वृद्ध, महिला भगिनीं, आणि खास करून तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.आणि ह्याच उत्साहातून गेली ४८ वर्षे एक गाव एक गणपती ही परंपरा जपली जातोय आणि ह्याच परंपरेचा वारसा जपणाऱ्या ह्या एक गाव एक गणपती उत्सवाला २०१६ सालचा विघ्नहर्ता पुरस्कार ह्या रिघरच्या राजाला मिळाला आहे.

आजकाल प्रत्येक घरां- घरांत विराजमान होणारे गणपती बाप्पा पाहता आणि सार्वजनिक मंडळाचा वाढता प्रतिसाद पाहता एक गाव एक गणपती ही परंपरा अबाधित ठेवणारं गाव अर्थात रिटघर हे गाव ज्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच आदर्शवत गावं सर्व भेद – भाव ,सर्व मतभेद बाजूला ठेऊन राजकारण विरहित फक्त आणि फक्त समाजहित डोळ्यांसमोर ठेवून सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ ह्या दिवसात एकत्र येत एकोप्याचं दर्शन देत ह्या उत्सवात एकत्रित काम करतांना दिसतात.आपल्या गावाचं नाव मोठं करतानां दिसतात.ह्या सोहळ्यात आपल्या सण- संस्कृतीचं आपल्या,अस्मितेचं जतनं व्हावं म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरे नुसार गणपती उत्सवाच्या काळात हरिपाठ,आरती,भजन,कीर्तन,काकडा,प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण, जागर ह्या सारख्या भक्तिमय कार्यक्रमासोबतच विविध क्षेत्रात आणि खास करून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या युवक-युवतीनांं आणि विद्यार्थी वर्गाला सन्मानीत करून प्रोत्साहित केलं जातोय आणि खास करून ह्या उत्सव काळात दरवर्षी शासकीय सेवेतील मोठं मोठे अधिकारी, पोलिस दलातील अधिकारी,तसेच तहसीलदार यांच्या सह अनेक मान्यवर बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थिती दर्शवितात,आणि म्हणूनच येथे गणपती बापाच्या दर्शनाकरिता येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचां यथोचित मान- सन्मान करून त्यांना सन्मानीत देखील केलं जातोय ते रिटघर गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने ! सोबतच येणाऱ्या भक्त गणांचं आणि ग्रामस्थांचं ह्या भक्तिमय दिवसांत मनोरंजन व्हावं म्हणून गीत-संगीत कार्यक्रमाचं आयोजन करत मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थां सोबत येणाऱ्या प्रत्येक भाविकांनां ह्या आनंदमय पर्वणीतून मंत्रमुग्ध केलं जातोय, सोबतच व्याख्यानं,प्रवचनं यांच्या माध्यमाद्वारे समाज प्रबोधनाच्यां कार्यक्रमातून समाजप्रबोधना सोबतच समाज्यात नवंपरिवर्तन देखील केलं जातोय ! आणि हे सर्व करत असताना सर्व ग्रामस्थांचे योगदान हे वाखाणण्याजोगे असते ! आणि म्हणूनच गणेश उत्सवाच येणारं ५० ( पन्नासावं ) सुवर्ण महोत्सवी वर्ष हे अगदी मोठ्या जल्लोषात, उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरं केलं जाईल अशी माहिती रिटघर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड भूषण भारतदादा भोपी यांनी दिली.
नक्कीच ह्या रिटघर गावाचा आदर्श इतर सर्व गांवानी घेतला तर गणेश उत्सव कसा साजरा करावा याची नक्कीच एक उत्कृष्ट कल्पना आणि प्रेरणा सर्वांच्या मनात घर करून बसेल आणि त्यातूनच समाज्यात एक नवी परंपरा उदयास येईल आणि अनावश्यक खर्च टळेलचं ! आणि गावांमध्ये एकजूट,संघटितभाव,सेवाभाव,सर्वधर्म समभाव ही भावना वाढीस लागेल आणि तीच प्रेरणादायी भावना प्रत्यक्षात जणमाणसांत रुजावी या करिता अश्याच मंडळाची,अश्याच आदर्शवत गावांची खऱ्या अर्थाने आज समाज्याला आणि देशाला खरी गरज आहे आणि खरं पाहता रिटघर गावाचा ” एक गाव एक गणपती ” हा उत्सव ही परंपरा सांगण्या ऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच हा आनंदोत्सव,ही अखंड परंपरा जर पाहायची असेल,अनुभवायची असेल तर या उत्सव काळात या आदर्शवत अश्या ” रिटघर ” गावाला एक वेळ जरूर भेट द्या !

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *