नारायण भागवत या मराठी माणसाने लावलेला शोध दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांसाठी वरदान ठरला!

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

धाडस आणि मराठी माणूस याबाबत खूप वाद होऊ शकतात. चाकोरीबद्ध जीवन, आपला प्रदेश न सोडता मिळेल त्या ठिकाणी नोकरी करत राहणारा सरळमार्गी माणूस म्हणून मराठी माणूस ओळखला जातो.

बहुतेक बरेच शोध परदेशी शास्त्रज्ञांनी लावले आहेत. बरेच भारतीय मुळाचे शास्त्रज्ञ परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत तेथे त्यांनी विपुल संशोधन केले आहे

पण भारतात राहून जगात प्रसिद्ध असलेली.. झालेली गोष्ट एका मराठी माणसाने शोधून काढली आहे हे सांगितलं तर पटेल का? ती प्रसिद्ध गोष्ट आहे डालडा!

आपलं वनस्पती तूप. देवासमोर निरांजनात फुलवात लावताना जो घट्ट तुपासारखा पदार्थ आपण वापरतो..तो डालडा. दिवाळीत शंकरपाळ्या हलकाफुलका करणारा डालडा.. चिरोटे जिभेवर विरघळून जातील असं करणारा डालडा म्हणजे वनस्पती तूप.

पूर्वी डालड्याचे पिवळ्या रंगाचे डबे मिळत. त्यातला डालडा संपला की कधी त्यात तुळशीचं रोप लावलं जाई..कधी बादली म्हणून कामाला येईल. साजूक तुपाला हा एक वेगळा आणि सामान्य माणसाला परवडेल असा पर्याय होता.

हे तूप एका मराठी माणसाने शोधून काढलं आहे. ही गोष्ट कितीजणांना माहीत आहे? याचं उत्तर जवळपास नाहीच आहे. आज या वनस्पती तुपाचा शोध लागला त्याची ही कथा!!!

ही कहाणी आहे, वनस्पती तूप शोधणाऱ्या त्या माणसाची. हा मराठी माणूस म्हणजे नारायणराव बाळाजी भागवत. हे भागवत मूळचे पंढरपूरचे. पण वडीलांशी न पटल्यामुळे बाळाजी भागवत घर सोडून मुंबईला निघून गेले.

तिथं अत्यंत कष्टाची कामे करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्याकाळात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी जगन्नाथ शंकरशेट ही शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली आणि आपलं शिक्षण पूर्ण करुन ते इंदौरच्या होळकर संस्थानाचे दिवाण झाले.

बाळाजी भागवतांची पत्नी पण त्या काळातील म्हणजे १९ व्या शतकातील मॅट्रिक पास होती. अशा सुशिक्षित कुटुंबात नारायणरावांचा जन्म १८८६ साली झाला. तेही आपल्या वडीलांसारखेच हुशार होते. त्यांनाही जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवायची महत्त्वाकांक्षा होती.

पण त्यांच्या एका नातलगाने त्यांना सांगितलं, तुझी परिस्थिती उत्तम आहे. ती शिष्यवृत्ती एखाद्या गरीब गरजू मुलाला मिळू दे. अभ्यास करायचा तो आनंदासाठी.. हे हवं असं म्हणून करु नकोस. ते त्यांनी आजन्म लक्षात ठेवलं.

जगन्नाथ शंकरशेट यांनी शिष्यवृत्ती मिळवायची महत्त्वाकांक्षा सोडून दिली. नंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स काॅलेजमधून रसायनशास्त्र या विषयात पदवी घेतली आणि जमशेदजी टाटा यांनी बेंगळुरू येथे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या मूलभूत संशोधन केंद्रात प्रवेश घेतला.

तिथे आॅईल्स आणि फॅट्सवर संशोधन केले. पास झाल्यावर नारायणराव येमेनला गेले. तिथे त्यांनी त्यांच्या वडीलांच्या मित्राचा साबणाचा कारखाना होता. त्यांना मदत करायला सुरुवात केली.

१९१९ मध्ये ते भारतात परत आले. आणि टाटा ऑइल मिल्स मध्ये नोकरीला सुरुवात केली.त्यावेळी पहिले महायुद्ध सुरू होते. सैनिकांना लोणी लागायचे. पण ते पुरवणे शक्य नव्हते. मग मार्गारीनचा शोध कामी आला. थिजवलेल्या तेलापासून बनवलेले मार्गारीन लोण्याला उत्तम पर्याय होता.

भारतीय सैनिक मात्र ते खायला तयार नव्हते. त्यांनी तुपाची मागणी केली. यासाठी परदेशात तेलापासून तूप तयार करण्याचा प्रयोग सुरू होता. अमेरिका व जपान गोडेतेलापासून तूप बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते पण त्यांना काही ते जमले नाही.

टाटा ऑइलमध्ये कपिलराम आणि नारायणराव भागवत यांना त्यात यश आले. ही गोष्ट त्यांच्या कंपनीचा वित्तीय सल्लागार असलेला ब्रिटिश अधिकारी त्याची कृती विचारायला आला. त्याला निक्षून नकार दिला.

जो शोध आम्ही लावला त्याचा आमच्या देशालाच फायदा मिळायला हवा आणि त्याचं श्रेयही आमच्याच देशाला हवं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं.

तेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती. या शोधाचा फाॅर्म्युला टाटा कंपनी आपल्याला देत नाही हे पाहून त्यांनी कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. कंपनी बंद पडली. कपिलराम आणि नारायणराव बेकार झाले.‌

अशा बेकारीत सात वर्षं काढली त्यांनी. त्या दरम्यान एका अमेरिकन कंपनीने त्यांना नोकरी देऊ केली. पण त्यांचीही अट होती तो तुपाचा फाॅर्म्युला नारायणरावांनी कंपनीला द्यायचा. नारायणराव अजिबात बधले नाहीत. ही सात वर्षं त्यांच्या बहिणीने शिक्षिकेची नोकरी करुन आख्खं कुटुंब चालवलं.

सात वर्षांनी कपिलराम यांनी गुजरातमध्ये साॅल्ट कंपनी सुरू केली आणि तिथं नारायणराव भागवतांना नोकरी मिळाली. कपिलराम व नारायणराव यांनी रसायनशास्त्रात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. पुढं ही कंपनी टाटांनी विकत घेतली. पण त्याची जबाबदारी मात्र या दोघांवरच राहीली.

नंतर नारायणरावांना परत एकदा मुंबईत परत यावं लागलं. पण तिथेही स्वस्थ न‌ बसता परत अनार अँड कंपनी स्थापन केली. साबण व इतर केमिकल्स ही कंपनी बनवायची.

वनस्पती तूप बनवण्यासाठी असलेला फाॅर्म्युला यांच्याकडंच होता. त्यांनी डालडा या डच कंपनीशी करार करुन वनस्पती तूप बनवणारी फॅक्टरी सुरु केली ती सेवर येथे.

१९३७ साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अखंड जगाला वनस्पती तूप पुरवण्याचं काँट्रॅक्ट त्यांना मिळालं आणि तिथूनच वनस्पती तूप म्हणजे डालडा हे समीकरणच झाले.

*आजही लोक डालडा वापरतात पण त्याचा शोध लावणारा माणूस कुणालाच माहीत नाही. पण हा शोध अजरामर झाला, किती तरी लोकांना ज्यांना साजूक तूप परवडणारे नाही त्यांना डालडाने कितीतरी वेळा असे पदार्थ सहजवारी उपलब्ध करून दिले.*

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *