जिवती, कोरपना, गडचांदूर येथे बसस्थानक निर्माण करा. ♦️आमदार सुभाष धोटेंची राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारकडे मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राज्य विधिमंडळाच्या आजच्या अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील ज्योती कोरपणा आणि गडचांदूर येथे बसस्थानक निर्माण करून येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. यावर उत्तर देतांना पर्यटन मंत्री दादा भुसे यांनी चौकशी करून यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जिवती, कोरपना हे तालुके निर्माण होऊन बरेच वर्ष झालेली आहेत. मात्र जिवती, कोरपना, गडचांदूर येथील स्थानिक नागरिकांची बसस्थानकाची मागणी आजतागायत पुर्ण झालेली नाही. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऊण, वारा, पाऊस अशा परिस्थितीत प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र अनेकदा मागणी करून, विधिमंडळात प्रश्न लावून धरल्यानंतरही याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक जनतेत कमालीचा असंतोष आहे. जनतेच्या भावना शासन दरबारी उपस्थित करून आ. धोटे यांनी या अत्यंत आवश्यक समस्येवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेवून स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. आता राज्य सरकार याबाबत काय आणि कशी भुमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here