लोकदर्शन
👉 By : Mohan Bharti

गडचांदूर :
मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस अंधार पडल्यानंतर शेतकरी त्यांची बैलबंडी घेऊन मेन रोडने शेतातून येत असताना गंभीर अपघात झाले. त्या दोन अपघातांमध्ये बैलबंडी वरील शेतकर्यासह त्यांचे बैल मरण पावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून 29 ऑक्टोबरला पोलीस स्टेशन गडचांदूरच्या वतीने मोहीम राबवून गडचांदूर शहरात शेत शिवारातून येणाऱ्या बैलबंडीना थांबवून बैलबंडीला रेडियम स्टिकर स्वतः गडचांदूर पोलिसांनी चिटकवले.
ही मोहीम कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, पोलीस कर्मचारी सुभाष तिवारी, धर्मराज मुंडे, व्यंकटेश भटलाडे यांनी राबवली.
सर्व शेतकऱ्यांनी रात्री महामार्ग वरून बैलबंडी नेताना बैलबंडीला रेडियम स्टिकर लावून सुरक्षा करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले आहेत. गडचांदूर पोलिसांनी केलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.




