लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : ऐन उमेदीच्या काळात युवकांना सेवानिवृत्त करणार्या युवकाशी मुलींनी लग्न करायचे काय? असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी मोदी सरकारला केला.
अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने जंतरमंतरवर सत्याग्रह आयोजित केला होता. यात खासदार धानोरकर सामील झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार धानोरकर म्हणाले, आरएसएसचे आधी अर्धी चड्डी घालायचे आता फुलपँट घालतात, हाच त्यांचा विकास आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांचे भविष्य अंधकारमय करण्याचा डाव रचला जात आहे. ज्या वयात युवक लग्न करून भावी आयुष्याचे स्वप्न पाहणार आहे. त्याचवेळी या युवकावर सेवानिवृत्तीची कुर्हाड कोसळली जाणार आहे. यातून या युवकाचे पुढील आयुष्य काय आहे. तसेच या योजनेबद्दल सरकार दररोज एक नवे ट्विट करीत आहे. यात आदेशात दररोज दुरुस्त्या सुचवित आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे लक्ष द्यायला या सरकारकडे वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु या मुद्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे. परंतु राहुल गांधी यांना अटक केल्यास काँग्रेसचा कार्यकर्ता हा सहन करणारा नाही. याचे जशास तसे उत्तर देण्यास काँग्रेसचा कार्यकर्ता तयार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले.