

सांगली :- महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अनेकांची घरवापसी होत आहे. तर इतर पक्षातील पदाधिकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहे. काल मात्र स्वाभिमानी विकास आघाडीचे (Swabhimani Vikas Aghadi) कार्यकर्तेच नाही पूर्ण आघाडीचं राष्ट्रवादीत विलीन झाली. आघाडीचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील (Bharat Patil) यांनी स्वाभिमानी विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करून आपल्या सर्व कार्यकर्त्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच सांगली जिल्ह्यात पवारांची पॉवर (Pawar Power) वाढली आहे. (Swabhimani Vikas Aghadi merged with NCP)
सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आटपाडीचे माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कै. रामभाऊ पाटील यांच्या पश्चात त्यांचे बंधू भारत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी विकास आघाडीची धुरा सांभाळत होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे स्वाभिमानी विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करून कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, आनंदराव पाटील, विलास नांगरे पाटील, अनिता पाटील, अश्विनी कासार, सुरज पाटील, किशोर गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. एन. पी. खरजे, राजू जानकर यांची भाषणे झाली.