लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटे यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी.
राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील ग्रामपंचायती कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक १६ जून २०२१ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत महावितरण कंपनीकडून स्थापित केलेल्या वीज बिलाचा भरणा संबंधित ग्रामपंचायतीणे करावा असे आदेश निर्गमित केल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्यासंदर्भात हालचाली सुरू असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती चिंतेत असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचे नियमित ठोस असे आर्थिक उत्पन्न नसल्याने राज्यातील अनेक ग्रामपंचायती सदर बिलाची रक्कम भरण्यास अकार्यक्षम आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत स्तरावरील स्थापित पथदिव्यांचे विद्युत देयकांची रक्कम यापूर्वी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे महावितरण कंपनीकडे भरणा करण्यात येत होता. यापुढेही ग्रामपंचायतीच्या बिलाची रक्कम ग्रामविकास विभागाकडून भरणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला अंधारात ठेवणे हा काही पर्याय नाही. कोरोनामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न सुद्धा नगण्य आहे. त्यामुळे आधीच ग्रामपंचायती आर्थिक संकटात असताना लाखो रुपयांची वीज बिले भरण्यास सक्षम नाही. त्यामुळे शासनस्तरावर ग्राम विकास विभाग व वीजवितरण विभागाने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. जो पर्यंत यावर शासन स्थरावर तोडगा निघत नाही तो पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीचे थकीत बिलाविषयी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये. याबाबतचे आदेश वीज वितरण विभागाला देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.