विधवांच्या हक्कासाठी उठलेला पहिला आवाज* *लता बोराडे* *सादिक खाटीक आटपाडी जि .सांगली .* *ज्येष्ट पत्रकार तथा प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात
*___________________________*
सांगली जिल्हयाच्या आटपाडी तालुक्यातल्या शेरेवाडी – आवळाई गावच्या लताताई बाळकृष्ण बोराडे हे नाव आता महाराष्ट्राला हळुहळू परिचयाचे होवू लागले आहे . त्या एक अशा शिक्षिका आहेत ज्यांनी स्वतःच्या वैधव्याच्या दुःखावर मात करून गेली ३० वर्षे विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, विधवांना सुहासीनीचा दर्जा देणारा कायदा अस्तित्वात यावा, विधवा प्रथा बंदीचा कायदा व्हावा, यासाठी कायदा करण्याचा हट्ट वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांकडे धरला आहे . अर्थातच त्यांची ही वाट बिकटच होती . विधवेने टिकली लावणे, सौभाग्य अलंकाराचा पुन्हा वापर करणे, याला कुटुंबाची आणि समाजाची साथ मिळणे मुश्कील असताना त्या गावोगावी विधवांची हिम्मत वाढवत फिरल्या . आधी त्यांच्या मनाची तयारी केली . त्यासाठी स्वतः २००४ पासून सौभाग्य अलंकार वापरण्यास सुरुवात केली . प्रसंगी लोकांच्या अघोषीत बहिष्काराला त्यांना सामोरे जावे लागले . पण त्या डगमगल्या नाहीत . आज त्यांचा विचार गावोगावी रुजताना दिसतोय . कोल्हापूर जिल्हयातील हेरवाड आणि माणगांव या दोन गावांनी यापुढे आपल्या गावातील विधवांना वैधव्याचे आणि अपमानाचे जीणे जगावे लागणार नाही . त्यासाठी गावात विधवांचा सन्मान आणि सौभाग्य अलंकार वापरण्या बरोबरच गावातील सर्व शुभकार्यात प्राधान्याने निमंत्रीत करण्याचे ठराव झाले आहेत . या घटने नंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या लोकसभेच्या खासदार सौ . सुप्रियाताई सुळे यांनी, राज्य सरकारला लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपासून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये असे ठराव व्हावेत अशी सुचना केली आहे . त्यानुसार राज्य शासनाने तसे परिपत्रक काढले आहे. आणि राज्यातील ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालीका, महानगरपालीकांमध्ये ही तसे ठराव होवू लागले आहेत . पण बदलाची सुरुवात करणाऱ्या लताताई बोराडे आणि त्यांचे आयुष्य जाणून घेणे गरजेचे आहे.
सुमारे ३० वर्षापूर्वी १९ वर्षाच्या लताताई , विवाहानंतर पतीसह मुंबईला निघाल्या . आवळाई माहेर आणि शेरेवाडी सासर या दोन्हीचे मिळूनच आवळाई एकत्रीत गाव आहे . मुलीचे कल्याण होईल म्हणून ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय करणाऱ्या युवका बरोबर त्यांचे लग्न झाले पण लग्नानंतर अवघ्या २५ व्या दिवशी त्यांच्या पतिचा अपघाती मृत्यू झाला . हातातील हिरवा चुडा अजून तसाच होता आणि ही दुर्घटना घडली . पतीच्या मृतदेहावर हातातला चुडा फोडणे, मंगळसुत्र तोडणे, जोडवी काढून घेणे, या साऱ्या विटंबने पेक्षा मरण बरे असे त्यांना वाटून गेले, हे सगळे करण्यापेक्षा पतीसोबत मलाही त्याच अग्नीत लोटून द्या म्हणत सती जाण्याचा आग्रह लताताईंनी धरला . मात्र समाजासमोर व नतलगांसमोर त्यांचे काही एक चालले नाही . त्या विद्रूप अवस्थेतच वैधव्याचा शाप घेऊनच त्यांना माहेरी परतावे लागले . पण या अपमानाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला . ही परिस्थिती बदलायची तर हा विषय लोकांना समजावून सांगीतला पाहीजे आणि लोकांनी आपले ऐकावे तर त्यासाठी समाजात आपले काही स्थान असले पाहीजे म्हणून लताताईंनी पुढचे शिक्षण घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे ठरविले . आणि पुढच्या काही वर्षात अर्धवट राहीलेले शिक्षण व आवश्यक प्रशिक्षण पुर्ण करून त्या शिक्षिका बनल्या . राज्य सरकारने नव्यानेच वस्ती शाळांचे धोरण आखले होते . २० किंवा त्यापेक्षा थोडे कमी विद्यार्थी जमवून जर एखादा प्रशिक्षीत शिक्षक तेथे शाळा चालवेल तर त्याला स्वयंसेवक म्हणून काम मिळायचे . अशी स्वयं सेवकाची लताताईंना नोकरी मिळाली . अवघ्या हजार – दीड हजार पगारावर पुढे १३ वर्षे त्यांना काम करावे लागले . अखेर लताताईंच्या कष्टाचे चीज झाले आणि वेतन आयोग धारक शिक्षिका त्या बनल्या . नोकरीने दिलेले आर्थिक स्थैर्य त्यांच्या निश्चया पासून दुर करू शकले नाही .
आटपाडी तालुका आणि आसपासच्या गावातील विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विधवा महिला विकास प्रतिष्ठान नावाने संस्था स्थापन केली . एकाकी पडलेल्या, असहाय्य विधवेच्या पाठीशी इतर महिलांचे पाठबळ उभे कर, संघटीतरित्या जावून त्यांच्या प्रश्नांबाबत कुटुंबीयांशी चर्चा कर असे काम त्यांनी चालु केले . प्रारंभी त्यांच्या कार्याचे कौतुक व्हायला लागले . मात्र विधवांना समानतेचा हक्क पाहीजे असे जेव्हा लताताई म्हणत तेव्हा त्यांना विरोध होवू लागला .
अगदी आजच्या काळात सुद्धा सकाळच्या वेळी विधवा स्त्री रस्त्यावर दिसली तरी तिला दोष द्यायचा, तुझ्या सकाळच्या दर्शनाने आमच्या दिवसाची वाट लागणार असे हिनवायचे . विधवेचे तोंड बघावे लागले म्हणून तीचे नाव न घेता शिवीगाळ करायची . असे प्रकार सुरूच होते . तिच्या असहायतेचा फायदा घेऊन वडलोपार्जीत इस्टेटीतून तिला बेदखल करायचे . हक्क डावलायचा . कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामील होवू द्यायचे नाही, असे प्रकार व्हायचे. अशावेळी या महिलांना साथ द्यायला लताताई पुढाकार घ्यायच्या . या दरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरुषाच्या बाबतीत अशी घटना घडली आणि त्याची पत्नी वारली तर समाज त्याला म्हणजे विधुराला दुर्दैवी ठरवत नव्हता . त्याला तात्काळ दुसरा विवाह करण्याची परवानगी असायची . त्याला कोणीही हिनवायचे किंवा बाजुला करायचे नाही . किंवा कोणत्याही सणा समारंभात विधवेचा प्रवेश त्याज्य मानला जायचा मात्र विधुराला मोकळीक असायची . या विरोधाभासाने लताताईंच्यातील बंडखोरी वाढत गेली .
विधवा, पतीच्या निधनानंतर त्याच्या मुलाबाळांचा आणि त्याच्या आई – वडिलांचा स्वीकार करते . त्याची कर्जे आपली जबाबदारी म्हणून फेडते, पण तरीही त्या कुटुंबात तिला महत्वाचे स्थान मिळत नाही . तिच्या म्हणण्याला काही किंमत दिली जात नाही . बायकांची अक्कल चुली म्होरं म्हणून त्यांचा आवाज दडपला जातो . त्यांना कितीही समजावल तरी ते विधवांना सन्मान द्यायला तयार नाहीत, हे लक्षात घेऊन लताताईंनी बंड पुकारले .
२००४ साली त्यांनी स्वतःच सौभाग्य अलंकार म्हणून कुंकु , अथवा टिकली लावणे, दागिणे घालणे,जोडवी घालणे सुरु केले . आपल्या या कृतीने इतर महिलांना बळ देईल . हे त्या जाणून होत्या . विशेषत : शहरी किंवा मोठ्या गावातील विधवा महिलांनी त्यांच्या प्रमाणे सौभाग्य अलंकार परिधान केले या नंतर तर ग्रामीण भागात अनेकांनी दबावाचे प्रयत्न सुरु केले . खरे तर वैधव्यामुळे आपल्या मुली घरात मरणप्राय : यातना सहन करत जगत आहेत हे कोणाला सहन होत नाही, अशा मुली आणि विधवा सुनांचे किमान हाल थांबले पाहीजेत . असे प्रत्येकाला वाटते पण भावकी काय म्हणेल, लोक काय म्हणतील आपल्या मुली बद्दल शंका घेतील अशा अनावश्यक दबावाला बळी पडत पालक आपल्या मुलीच्या या यातना सहन करत राहतात . तोंड दाबून बुक्क्यांचा मार घेण्याचे समाजात सुरु आहे . विधवांच्या अनेक कुटुंबात अशी हेळसांड सुरु असल्याने लोक नावे ठेवतील म्हणून विधवेला साधी टिकलीही लावू दिली जात नाही . हे लताताईंच्या ध्यानात आले . त्या टिकली लावू लागल्यापासून अनेकांनी आपल्या घरातील महिलांवर त्यांच्याशी बोलणे टाळण्यासाठीही दबाव आणला . एक प्रकारे अघोषीत बहिष्काराचा प्रयोग सुरु झाला . महिलांनी त्यांच्याशी संपर्क ठेवू नये हा दबाव फारसा टिकला नाही . मात्र त्याचा परिणाम झाला . अखेर हा विषय केवळ लोकांना समजावून मार्गी लागू शकत नाही . त्यासाठी कायद्यानेच दबाव वाढवावा लागेल असे त्यांनी पक्के ठरविले. आणि मग सुरु झाला मंत्रीमंडळ पातळीवर पाठपुरावा . एका बाजुला तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांच्या बाजुला धावून जायचे . आणि दुसऱ्या बाजूने मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्षाचे नेते यांची भेट घेऊन या सुधारणांचे महत्व सांगायचे . अशी दुहेरी कामगिरी लताताई नोकरी सांभाळत करायच्या .
१९९७-९८ सालापासून त्या मंत्री, आमदार यांना भेटून अथवा पत्रव्यवहारा द्वारे विधवा महिलांना समानतेचा अधिकार द्यावा . सुहासिनीचा दर्जा आणि विधवांना , विधवा न म्हणता सक्षम कुटुंबकर्ती असे संबोधले जावे . आणि विधवा महिलांना सौभाग्य अलंकार वापरण्यापासून सर्व हक्क समान पद्धतीने देणारा कायदा केला जावा अशी मागणी त्या वारंवार करीत आल्या आहेत . अनेक नेत्यांनी त्यांच्या या मागणीचे कौतुक केले . मात्र समाज सहजा सहजी आपले मत बदलत नसतो . त्यासाठी सामाजीक रेटा निर्माण झाला पाहीजे . तरच सरकारला दखल घेता . येईल . असे नेते मंडळी सांगू लागले . या नंतर निराश न होता लताताईंनी आपल्या कार्याला, विधवा महिला मेळाव्याची जोड दिली . गावोगावी जायचे विधवा महिलांना एकत्र करायचे . आणि विधवांचे हळदीकुंकू करणार आहोत असे निडरपणे सांगून विधवा महिलांना निमंत्रीत केले जावू लागले . तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये ही लताताईंच्या प्रयत्नांना विधवांनी धाडसाने साथ देणे सुरु केले . हे सुरु असतानाच महिलांमध्ये असणारी अंधश्रद्धा, देवाला सोडलेल्या महिलांचे शोषण, महिलांच्या अंगात येणे, जटा ठेवणे , करणी, भानामती, जादुटोणा या विरोधातही लोकांचे प्रबोधन करणे सुरू केले . त्याचा परिणाम म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन समितीने त्यांच्या एकुणच कार्याची दखल घेतली . सांगलीच्या शांतीनिकेतन मध्ये तारा भवाळकर, नीताताई केळकर, प . रा . आर्डे आणि आटपाडीचे आर . एस . कुलकर्णी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा या कार्यासाठी सत्कार करणेत आला . अंनिस सारख्या संस्थेचे पाठबळ लाभल्याने त्यांची माहिती दुर वर पोहचली.
आता या कार्याला गती आली आहे . महिला ठामपणे कपाळाला टिकली लावून आपल्याला विधवा म्हणणाऱ्यांना आव्हान देवू लागल्या आहेत . कोणाच्याही दबावाखाली न राहता आपल्या कुटुंबाच्या हितासाठी त्या झटत आहेत . पती पश्चात संसार तर त्यांनाच सांभाळावा लागतो मग अन्याय का ? हे प्रश्न महिला उपस्थित करू लागल्या आहेत . त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नव्या युगातील महिला आपल्या समवयस्क विधवांच्या हक्कासाठी एक होवू लागल्या आहेत . त्याचेच पडसाद हेरवाड आणि माणगांव सारख्या गावातील महिलांनी सुचक,अनुमोदक होवून विधवांच्या सन्मानाचा प्रस्ताव ठेवला . आणि समस्त गावाने तो उचलुन धरला . कोल्हापूरच्या प्रागतिक भूमीत संमत झालेले हे ठराव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मांडले जावू लागले आहेत. राज्य सरकारने आता आपली ही जबाबदारी मानून काम सुरु केले आहे . विधवा प्रथा बंदी आणि विधवांच्या सन्मानाचा कायदा करा, ही लताताईंची मागणी असली तरी त्यांच्या विचारांना समाज मान्यता मिळण्यापर्यत, सध्या समाज सुधारणा सुरु झाली हे त्यांच्या आजवरच्या कार्याचे यश आहे . कदाचित पुढच्या टप्प्यात विधवा प्रथा बंदीचा कायदा आणि विधवांना सुहासिनींचा दर्जा देणारा नवा कायदा अंमलात येईल , ही खऱ्या अर्थाने लताताई बोराडेंच्या कार्याची पोहोच पावती असेल .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *