लोकदर्शन 👉 राहुल खरात सर
नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२ ची नुकतीच राज्यस्तरावरील पहिली फेरी पूर्ण झाली. ज्यामध्ये राज्यस्तरासाठी शिक्षक व मुख्याध्यापक गटामध्ये १४५ पात्र प्रस्तावांचे निवड समिती मार्फत मूल्यांकन करुन अंतिम सादरीकरण फेरी करीता बेस्ट १० नवोपक्रम निवड करण्यात आले.
या प्रथम 10 क्रमांकामध्ये ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील सौ. शर्मिला विधाटे यांनी प्रभाविपणे राबवलेल्या ‘घरोघरी शाळा’ या अभिनव उपक्रमाची राज्यस्तरीय अंतिम 10 मध्ये निवड करण्यात आली.
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांनी ‘घरोघरी शाळा’ हा अभिनव उपक्रक्रम वडगाव येथे शैक्षणिक वर्षे – 2020 -21 या कोरोनाच्या संकटकाळात राबवून यशस्वी केला.
कोरोना संकटकाळात शाळा बंद असतानाही 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवणारा हा उपक्रम 2021-22 या कोरोना संकट काळात सरांनी महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यातील 250 हून अधिक शिक्षकांना मार्गदर्शन करुन राज्यभर पोहचवला. सदर शिक्षकांच्या माध्यमातून राज्यभरात 2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या घरातच स्वतंत्र शाळा निर्माण करुन 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवण्याची किमया साधली.
यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, विविध वर्तमानपत्रातील बातम्या तसेच विविध न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेल्या ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाच्या स्टोरी व बातम्या पाहून राज्याच्या विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी खरात सरांशी संपर्क साधून सदर उपक्रमाची माहिती घेवून सदर उपक्रम आपापल्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.
कोरोना संकटकाळात उदयास आलेला सदर उपक्रम नियमित शाळा सुरू झाल्यानंतर विविध कारणांनी अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचा मूळ पाया भक्कम करुन 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
घरोघरी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचन-लेखन कौशल्या बरोबरच मूल्यशिक्षण तसेच घरातील प्रौढ व्यक्तींचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवणाऱ्या सदर उपक्रमात राज्यातील अनेक शिक्षक सहभागी होत आहेत.