आटपाडी, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,व डबई कुरण इतिहास

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

सन १९४४-४५ साली आटपाडी येथे पूर्वश्रमीच्या महार समाज्याची बैठक “ तक्यात ” आयोजित करणेत आली होती. सदर बैठकीत समाज्यातील कारभारी मंडळींनी कथन केले कि :- औंधचे राजे श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी यांनी डबई कुरणातील चारशे एकर जमीन समाज्याला उदरनिर्वाहासाठी देण्याचे जाहीर केलेले आहे. सर्वांनी मेहनत, मशागत करून गुजरान करावी. परंतु गांव नोकरा प्रमाणेच ग्रामरक्षक म्हणून सुद्धा समाज्यास काम करायचे आहे. यावर सर्वांनी विचार करून सहमती दर्शवली सर्वांचेच एकमत झाले, याबाबतीतील बोली- चाली करणे बाबतचे अधिकार समाज्यातील कारभारी मंडळींना देणेत आले. सदर बैठकीत डबई कुरणातील जमीन मिळवून देणेसाठी मौलाचे सहकार्य करणारे औंधचे राजपुत्र बॅ. आप्पासाहेब पंत प्रतिनिधी मा. रुस्तमराव देशमुख (बापू) व मा. अमीनुद्दीन कुरेशी यांचेही आभार मान्येत आले.

औंधचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी यांनी आटपाडी येथील डबई कुरणातील जमिनीचे वाटप खालील प्रमाणे केले होती.- १) कैद्याच्या खुली वसाहतीसाठी जमीन दिलेली होती. २) फॉरेस्टसाठी राखीव कुरण ठेवलेले आहे. ३) आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाज्यासाठी चारशे एकर जमीन देणेत आली होती. औंध संस्थानचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी हे संस्थांनचा राज कारभार जनतेच्या हिताचा व न्यायाचा करून अनेक धोरणात्मक दूरदर्शी निर्णय घेतलेले होते. त्यांच्याच भाग म्हणून पूर्व- श्रमीच्या महार समाज्यास डबई कुरणातील जमीन प्रदान करणेचा निर्णय होता. त्यामुळे समाज्यामध्ये सामाजिक मालकीचे नवचैतन्य निर्माण झाले होते. गाव गाड्यांच्या कामात प्रामाणिकपणे समाज नेमूण दिलेले कार्य , इनामे इतबारे करीत होता. त्यामुळे डबई कुरणातील जमिनीचा ताबा दिलेला होता. परंतु औंध संस्थान हे भारतात विलीन करणेची घोषणा सन १९४६ सालीच करणेत आली असले मुळे डबई कुरणातील जमिनीचे हस्तांतर थांबलेले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वश्रमीच्या महार समाज्याने सरकारी दरबारी अर्ज विनंत्या केलेल्या होत्या. सदर डबई कुरणातील जमिनी बाबत फार मोठा संघर्ष समाज्याने उभा केला होता. त्यामुळे शासनाने बॅ- आप्पासाहेब पंत प्रतिनिधी व इतर मान्यवरांशी विचारविनिमय करून शासनाने सन १९५०-५१ साली डबई कुरणातील ४२८ एकर १४ गुंठे जमीन पूर्वश्रमीच्या महार समाज्यास देणे बाबतीची आधिकृत घोषणा करणेत आली. याबाबतीत शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असलेचे सांगितल्यामुळे समाज्याच्या एकजुटीच्या संघर्षाला न्याय मिळाला होता.

सन १९५२-५३ साली शासकीय अधिकारी डबई कुरणातील पूर्व श्रमी महार समाज्याच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीमध्ये जाणेस अडथळा निर्माण करू लागले. त्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होऊ लागला. अधिकाऱ्या बरोबर वाद विवादाचे प्रसंग घडू लागले. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे “तक्यात” बैठक बोलविण्यात आली. सर्वांनी मिळून सखोल चर्चा केली. सरकारी अधिकाऱ्यांशी संघर्ष करणे पेक्षा उबई कुरणातील जमिनीवर तोडगा काढला पाहिजे यावर सर्वांनुमते असे ठरले की, अॅड. शंकरराव खरात हे पुण्यामध्ये वकिली करतात व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात असतात. तसेच शेड्युल कास्स्म फेडरेशनचे आमदार पी .टी मघाळे साहेब या दोघांना बोलावून जमिनी बाबतची माहिती सांगून यावर मार्ग काढणे बाबत चर्चा करून निर्णय घेणेत यावा असे ठरले, त्यानुसार पत्रे पाठविणेत आली.

त्यानंतर काही दिवसांनी अॅड. शंकराव खरात व आमदार पी .टी मघाळे आटपाडीस आले. समाज्यातील कारभारी मंडळींनी भेट घेऊन डबई कुरणातील जमिनीबाबतची वास्तवता त्यांच्यासमोर मांडली. समाज्याला जमिनीचा हक्क मिळवून द्यावा व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या कानावर हा विषय घालून मार्ग काढावा. त्यावर सर्वांचे म्हणणे दोघांनीही ऐकून घेतले व लवकरच मार्ग निघेल असे सांगून समाज्याला धीर व आधार दिला.
सन १९५४ साली पुणे येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले असताना ॲड. शंकराव खरात व आमदार पी.टी.मघाले या दोघांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाज्याला मिळालेली डबई कुरणातील जमिनीची माहिती दिली.

डॉ. बाबासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतले व म्हणावे मे.कलेक्टर सांगली यांना पत्र द्या. त्या पत्रामध्ये पूर्ण गोषवारा नमूद करा व संबंधित विभागास सुद्धा पत्र द्या, त्यानंतर पुढे काय होते ते मला सांगा त्यानंतर समाज्याच्या वतीने मे. कलेक्टर सो, सांगली व संबंधित विभागास पत्रे देण्यात आली होती.

आटपाडी तक्यामध्ये पूर्वश्रमीच्या महार समाज्याने एकत्र येऊन दिनांक ३०/०५/१९५५रोजी नियोजित आटपाडी महार शेतकी सोसायटीची स्थापना केली. चीफ प्रमोटर म्हणून सदाशिव मारुती मोटे यांची निवड सर्वांनुमते करणेत आली. सोसायटीचे ६७ सभासद झाले प्रत्येक मेंबर शेअर्स म्हणून १० रुपये व प्रवेश फी १ रुपया घेऊन शेती संस्थेचा जमीन मागणीचा प्रस्ताव मे. कलेक्टर सो, सांगली यांना सादर करणेत आले.

सन १९५५-५६ साली मे.कलेक्टर साहेब सांगली यांनी दिनांक २७/४/१९५६ रोजी हुकूम नंबर एल.जी.एल.एस.आर.७१२ ने आटपाडी डबई कुरणातील सर्वे नंबर ८२४,९२२,९२३ मधील क्षेत्र १७३ हेक्टर ३५ आर या जमिनीची नियोजित आटपाडी महार शेतकी सहकारी सोसायटी यांना कब्जेपट्टीने कायम स्वरूपी देणेचा आदेश काडणेत आला. सदर जमिनीचा कब्जा महार शेतकी सोसायटीस दिनांक १४/७/१९५६ कब्जा पट्टीने दिलेला आहे. म्हणून आटपाडी येथील उबई कुरणातील जमीन क्षेत्र १७३ हेक्टर ३५ आर या तिन्ही सर्वे नंबरच्या जमिनी सन १९५६-५७ सालापासून सदर आटपाडी महार सहकारी शेती सोसायटीच्या ताब्यात देऊन लागवडीसाठी देण्यात आलेल्या आहेत.

मे. कलेक्टर साहेब सांगली यांनी शासनाचा महसूल विभागाचा ठराव नंबर एल. एन.डी.३९५० (अ) तारीख ०१/०३/१९६० आणि एल. एन. डी.३९६०-/८४४६१ (अ)ता.०४/०१/१९६२ च्या शासनाच्या महसूल विभागाच्या ठरावाने आटपाडी येथील डबई कुरणातील जमिनीच्या कायम विल्हेवाटी बाबत मे. कलेक्टर साहेब सांगली यांचे कडील हुकूम नंबर एल. एन. डी.३९६० तारीख २८/०८/१९६१ रोजी मे. मामलेदार खानापूर यांना डबई कुरणातील सरकारी मुलकी पड जमिनी मधील १७३ हेक्टर ३५ आर जमीन आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती सोसायटीस जमिनीना कायम व्हिलेवाटी बाबत अधिकार दिलेले आहेत.

त्यानुसार मे. कलेक्टर साहेब सांगली यांचे आदेशानुसार मे. मामलेदार खानापूर यांचे हुकूमा नुसार आटपाडी येथील डबई कुरणातील सरकारी पड जमीन नियोजित…… आटपाडी महार शेतकी सोसायटी यांना अटी व शर्ती घालून कायम विल्हेवाटीने देण्यात आलेल्या आहेत.
शासनाने डबई कुरणातील सर्वे नं/ गट नंबर दिलेली जमीन
गावाचे नाव सर्व्हे नं. चालू गट नं. क्षेत्र पोटखराब आकार
आटपाडी ८२४ ३४१० ५७.२८ ९.१५ ०७.१९
,, ९२२ ३४०९ ४९.५६ ३.९८ १२.४४
” ९२३ ३४१२ ४९.५० ३.८१ १२.४४
अशा या पद्धतीने नियोजित आटपाडी महार शेतकी सोसायटीस सदर जमीन मे.कलेक्टर सो, सांगली व मे. मामलेदार खानापूर यांच्या आदेशाने व हुकुमाने दिलेल्या आहेत.

सदर सोसायटीस जमीन मिळाले नंतर शासनाच्या अटी व शर्तीचे पालन चीफ प्रमोटर, पंच मंडळ व सभासदांनी पूर्ण केलेल्या आहेत त्या अशा:-
१) आटपाडी येथील उबई कुरणातील मिळालेल्या जमिनीची प्रथम मेहनत व मशागत सोसायटीने केलेली आहे. सदर जमिनीवरील झाडांचे किंमती बद्दल दिनांक १४/०७/१९५६ चे पंचनाम्या नुसार रक्कम रुपये २५०/-(दोनशे पन्नास) मात्र सोसायटीने शासनाकडे जमा केलेले आहेत.
२) सोसायटीने रक्कम भरून शासनास कबुलायात करून दिलेली आहे.
३) जमिनीची देणगी (ग्रॅन्ट )नवीन शर्तीवर आणि अविभाज्य शर्तीवर केलेली आहे.
४) सदरची जमीन मेहनत, मशागत करून लागवडीखाली आणलेली आहे, सदरची जमीन पड अगर दुर्लक्षित ना फेर ठेवलेली नाही.
५) प्रत्येक वर्षी सदर जमिनीचा शेतसारा सोसायटी शासनाकडे भरत आहे.
६) सोसायटीच्या कोणत्याही सभासदाकडे १६ एकरा पेक्षा जास्त जमीन नाही.
७) शासनाने ज्या कबूलायतीच्या अटी घालून दिलेल्या आहेत त्यांचे पालन सोसायटीने केलेले आहे.
अशा प्रकारे शासनाच्या अटी व शर्तीचे पालन केले मुळे मे. मामलेदार खानापूर यांनी सदरच्या जमिनीचा हुकूमाच्या आदेशाची प्रत सदाशिव मारुती मोटे पंच व प्रमोटर नियोजित आटपाडी महार शेतकी सहकारी सोसायटी आटपाडी यांना देण्यात आलेले आहे.

शासनाच्या आदेशाची प्रत मिळालेनंतर दिनांक-०५/०४/१९६९रोजी आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्था लि.आटपाडी या नांवाने संस्थेची नोंदणी करणेत आली. नोदणी क्रमांक ३३१ ने दिनांक ०५/०४/१९६९ रोजी नोंदणी कृत संस्था स्थापन करणेत आली. त्यांचे प्रथम संचालक मंडळ निवडनेत आले.

१)सुदाम येसू मोटे – चेअरमन २) बाबा तुकाराम खरात – व्हाईट चेअरमन ३) तुकाराम गेनू कदम – संचालक ४) उद्धव संतू खरात – संचालक ५) निवृत्ती येताळा खरात – संचालक ६) तातू कृष्णा खरात -संचालक ७) राजाराम इजाप्पा पवार – ८) व सेक्रेटरी नेमणूक करण्यात आलेले आहे.

वरील प्रमाणे पंच कमिटी आटपाडीच्या “ तक्क्या ”मध्ये निवडणेत आली होती. सदर सोसायटीचे ६७ सभासद हे मागासवर्गीय होते व एक शासनाचा प्रतिनिधी घेवून ६८ सभासदांची सोसायटीची स्थापना करणेत आली.
सदर संस्थेच्या सभासदानी एकत्र येऊन वैयक्तिक व सामुदायिक प्रयत्न करून जमिनीची मेहनत, मशागत करून जवळ-जवळ सर्वच क्षेत्र –(पोट खराब सोडून) लागवडी खाली आणलेले होते, काही सभासदांनी स्वखर्चाने बैल जोडी विकत घेतली होती, त्या सभासदांची नावे १) संतु मेघा खरात २) सुखदेव पांडुरंग खरात ३)दशरथ मसू मोटे ४)भिमराव मोटे ५) आकारम व तुकाराम संभू

खरात ६)ज्ञानू भागवत खरात एक बैल ७) तातू कृष्णा खरात एकच बैल घेतला ८) सोसायटीने सुद्धा बैल जोडी घेतलेली होती. ४०० एकर क्षेत्रात पेरणीसाठी काही वेळा नांगरे मळा, माळी वस्ती, बनपुरी व आटपाडीचे नारायण देशपांडे यांचे कडील बैल जोडी घेऊन पेरणी, मेहनत मशागत करीत असत सदर सोसायटीचे सभासद मिळालेल्या जमिनीची सेवा करून उदर निर्वाह चालवित होते. जमीन त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते.

सदर सोसायटीने सन-७०-७१ साली जमीन सुधारणा कर्ज घेलते होतो. त्यामध्ये १)जमीन सुधारणा कर्ज रुपये १४६२१/- २)गोडाऊन कर्ज कडील रु.३७५०/- ३) विहर कर्ज कडील रु.४०००/- ४) ऑइल इंजिन कर्ज रु.४६००/- असे एकूण २६५७१ रुपये इतके कर्ज घेतलेले होते. त्या कर्जातून पंच कमिटीने गट नंबर ३४०९ व गट नंबर ३४१२ मध्ये विहिरी खोललेल्या होत्या, ऑईल इंजिन घेतले होते. धान्य गोडाऊन बांधले होते .सिमेंट पाईप लाईन जमिनीमध्ये केलेली होती. बैलजोडी व गाडी घेतलेली होती. तसेच शेती कामासाठी लागणारी सर्व अवजारे खरेदी केलेली होती.

सदर सोसायटीचे पंच कमिटी व सभासद हे कृषी खाते, जिल्हा परिषद ,पंचायत समिती यांचे बरोबर संपर्क साधून शेती सुधारणेसाठी मार्गदर्शन घेत होते .मेहनत, मशागत करून जमीन पेरणी लायक बनवली होती. त्यातील झाडे- झुडपे तोडून त्यांचा रितसर पंचनामा करून झाडे विक्री करून रक्कम शासन जमा केली आहे . सदर जमिनीमध्ये बाजरी, ज्वारी मटकी, तीळ , हुलगे,तूर इत्यादी पिके घेत होते. बाजारी मटकीची विक्रमी उत्पादन घेत होते. त्यामुळे सोसायटी उर्जित अवस्थेत होती. सदरचे सोसायटीने सदर जमिनी मध्ये कृषी विभागामार्फत मोठे मातीनाला बांध घातलेले आहेत. वगळीवर छोटे माती बांध घातलेले आहेत.( लूज बॉर्डर) तसेच तिन्ही गटात शेत बांध (कंर्पाटमेंन्ट) घातले आहेत .सध्या बंधाऱ्यामुळे शेतीस पाण्याची सोय झालेली आहे.

सदर सोसायटीच्या बिनविरोध निवडी होत होत्या. त्यानंतर चेअरमन म्हणून नारायण मकू मोटे यांचा कार्यकाळ काही दिवस होता. त्यानंतरचे चेअरमन म्हणून तातोबा कृष्णा खरात यांची निवड करणेत आली होती. त्यांनी काही वर्षे कामकाज चालविले.
त्यानंतर नवीन पंच कमिटी निवडणेत आली. ती खालीलप्रमाणे :-
१) बाबा तुकाराम खरात – चेअरमन २) प्रल्हाद सोमा खरात – व्हा. चेअरमन ३)उद्धव संतू खरात –सदस्य ४) पांडुरंग खिराप्पा मोटे ५) राजाराम इजाप्पा पवार ही पंच कमिटी निवडले नंतर सदर सोसायटीचे कामकाज करू लागले होते.

सन १९७२-७३ साला नंतर वारोवांर पडणाऱ्या दुष्काळामुळे पेरलेली पिके पाण्या अभावी जळून जाऊ लागली. विहिरी पूर्णपणे आटलेल्या होत्या, त्यामुळे सोसायटीचे अतोनात नुकसान होऊ लागले. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमुळे शेतजमिनीचे पीक येत नसलेमुळे सोसायटीचे कामकाज बंद पडत चालले होते. पाऊस अजिबात नसल्याने सदरचा भाग अवर्षणग्रस्त म्हणून जाहीर झाला. सदरची पंचकमिटी, सभासद जमिनीचे मेहनत, मशागत करीत होते, परंतु पाण्याअभावी त्यांचे प्रयत्न तोकडे पडू लागले. संस्थेचे कामकाज पाच ते सात वर्षानंतर बंद पडले. त्यामुळे सदर संस्था मा.सहायक निबंधक आटपाडी यांनी दिनांक २७/१०/१९८९ रोजी अवसायानात घेवून नेमणूक केली .त्यानंतर दिनांक २६/०५/१९९२ रोजी सदर संस्थेची नोंदणी रद्दकरणेत आली.

त्यानंतर सदर संस्थेचे अवसायक एक व सहाय्यक निबंधक यांनी दिनांक ०७/१२/१९९२ रोजी पत्रांने मा.तहसीलदार सो.व मा. जिल्हाधिकारी सो, यांना लेखी कळविले आहे कि, सदर संस्थेची नोंदणी रद्द केली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे कृषी व सहकारी विभागातील ठराव क्रमांक सी.एस.ई . १०७१/१३१९ सी.४ मुंबई ३२ दिनांक ९ जानेवारी १९७३ प्रमाणे सदर सामुदाईक शेती संस्थेच्या मालकीची जमीन त्या संस्थेतील ६७ सभासदांच्या मालकीची करावी, तसेच संस्थेच्या सातबारा उताऱ्यावरील असणारे अवसायकाचे नाव कमी करणेत येवून सदर जमिनीवर संस्थेच्या सभासदांची नावे नोंद करावी असे पत्राने कळविले आहे.
सदर संस्थेच्या सभासदांनी दिनांक ०२/०२/१९९४ व दिनांक २१/०८/१९९८ रोजी मा. तहसीलदार व मा. जिल्हाधिकारी साहेब व विभागीय आयुक्त पुणे यांना लेखी पत्राने कळवले आहे की जमीन सभासदांच्या नावे करण्यात यावी.

सदर संस्थेची जमीन गट नंबर ३४०९,३४१०,३४१२मधील १५६ हेक्टर ४१ आर क्षेत्रामध्ये संस्थेचे ६७ सभासद प्रत्येकी सहा एकर याप्रमाणे जमीन कसत आहेत, व पिके घेत आहेत. प्रत्येक वर्षी शेत सारा भरत आहेत. संस्थेकडे व सभासदाकडे शासनाचे कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी नाही,

त्याबाबत जिल्हा उपनिबंधक साहेब यांनी दिनांक १५ मे १९९२ रोजी दाखला दिलेला आहे.तसेच अवसायक यांनी दिनांक ७/१२/१९९२ रोजी पत्राने कळवले आहे की, संस्थेची जमीन ६७ मागासवर्गीय सभासदांना समान वाटप करण्यास हरकत नाही असे लेखी कळविलेले आहे. तसेच सहाय्यक निबंधक यांनी ही पत्र दिलेले आहे.त्याच प्रमाणे मा.

जिल्हाधिकारी सो, व विभागीय आयुक्त पुणे यांनी शासनास दिनांक २९/०५/२०१२ रोजी मा.अव्वर सचिव महसूल विभाग मंत्रालय मुंबई यांना जमीन मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे.

सन २००७-०८ च्या दरम्यान संस्थेच्या सभासदांनी “तक्त्यात” बैठक घेऊन शासनास निवेदन, प्रस्ताव सादर करणेत आला आहे. जमीन मागणीचा प्रस्ताव मंत्रालयात ५वर्षा नंतर पोहचला त्या नंतर शासनाकडून आलेल्या अनेक त्रुटीची पूर्तता प्रत्येक वेळीस करून दिलेली आहे. तसेच संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना अनेक निवेदने दिलेली आहेत, संबंधित विभागात ज्या ठिकाणी प्रस्तावाची फाईल जाईल त्या ठिकाणी अनेक हेलपाटे घातलेले आहेत. त्यासाठी कष्ट,त्रास, दगदग , प्रवास सर्व सहन करणेत आलेले आहेत. जवळजवळ जमीन मागणी बाबत फाईल सोबत संबंधित विभागास नऊ ते दहा हजार पर्यंत कागदपत्रे दिलेली आहेत. अनेक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे सहानुभूतीपूर्वक सहकार्य केलेले आहे. तसेच अनेक मान्यवरांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील मंत्रालयातील महसूल विभागाकडे कसबे आटपाडी येथील आटपाडी महार सामुदायिक सहकारी शेती संस्थेच्या जमीन वाटपाचा प्रस्ताव क्रमांक /जमीन/३६९९ /प्र.का.सा./६४६ /पुर्नर बांधणी /३९ /ज-अ महसूल विभाग मंत्रालय मुंबई येथे दिनांक १०/११/२०१२ पासून जमीन वाटपाची फाईल पडून आहे. त्याबाबत शासन स्तरावर आज तगाईत निर्णय घेतलेला नाही म्हणून पूर्व श्रमीच्या महार समाज्याची व सध्याच्या बौध्द समाजाची कैफियत ची वास्तविकता आपणासमोर सादर केलेली आहे.

सदरची जमीन सध्या सभासदाच्या ताब्यात व वहिवाटीत असून सात बारावर नाव नसले मुळे जमिनीसाठी कर्ज अथवा कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ घेता येत नाही, नोकरी नसल्यामुळे अनेक सभासदांचे कुटुंब शेतीत राबत आहेत, राबणाऱ्या सभासदांच्या पाचशे वारसांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे.

विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी. जि .सांगली महाराष्ट्र मो.नं.९२८४०७३२७७

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *