लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – १४ मार्चपासून शिक्षकांचा बेमुदत संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील महिला बचत गटाने पुढाकार घेतला असून सोमवारपासून शाळा सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील नित्यानंद महिला बचत गटाच्या महिलांनी हा कौतुकास्पद निर्णय घेतला असून गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून ग्रामपंचायत, शाळा समिती व पालकांच्या संमतीने शाळा सुरू केली आहे.
नित्यानंद महिला बचत गटाच्या सदस्या तथा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सलमा फिरोज पठाण, बचत गटाच्या सदस्या सोनाली राजू नन्नावरे व वनिता नितेश बेरड ह्या महिलांनी पुढाकार घेऊन शाळा सुरू करून एक आदर्श निर्माण केला असून पालकांनी उत्तम प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे सुरू केले आहे. जोपर्यंत संप सुटत नाही, तोपर्यंत शाळा चालविण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे.