

लोकदर्शन 👉 मोहन भारती
- अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते.
या आगीबद्दल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसंच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल.
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपण घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे”.