सिडको व रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांमध्ये सकारात्मक चर्चा घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा – सुनीता ठाकूर

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २० सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या हम करो से कायद्यामुळे आज धुतूम रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी धुतूम ग्रामस्थांवर २३ मार्च रोजी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे.ही गंभीर बाब आहे.तरी सिडको बाधित गावांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाने धुतूम प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा घडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे अशी मागणी धुतूम गावच्या पोलीस पाटील सुनीता किशोर ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

धुतूम गावच्या पोलीस पाटील सुनीता किशोर ठाकूर यांनी सांगितले की उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी देशाच्या उन्नती साठी सिडकोला संपादित करुन दिल्या आहेत.त्यावेळी शासनाने सिडकोच्या माध्यमातून सिडको बाधित प्रकल्पग्रस्त गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच रहिवाशांना नागरी सुविधा बरोबर नोकरी,व्यवसाय उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते.परंतु या जनहिताच्या समस्यांना न्याय मिळवून न देता.प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सिडकोने सातत्याने केले आहे.त्यात सिडको बाधित गावांची नावे ही त्या त्या गावातील रेल्वे स्थानकांना न देता त्या गावांची ओळख पुसण्याचे काम हे सिडको आणि रेल्वे प्रशासन जाणूनबुजून आता करत असेल तर ते योग्य नाही.

सिडकोच्या अशा दुपटी धोरणामुळे सिडको बाधित गावा गावांमध्ये तेढ निर्माण होणार असून त्या गाव परिसरातील कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे.आज धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच कविता कुंदन ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या करिष्मा रुपेश ठाकूर,स्मिता नंदकुमार ठाकूर,सुचिता राजन कडू,अनिता सुजित ठाकूर, रविनाथ बाळाराम ठाकूर,प्रकाश काशिनाथ ठाकूर, चंद्रकांत कमळाकर ठाकूर, प्रेमनाथ अनंत ठाकूर आणि धुतूम गावातील ग्रामस्थांनी एका छताखाली येऊन चुकीच्या रांजणपाडा रेल्वे स्थानकाच्या नामकरणात दुरुस्ती म्हणून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे तसेच धुतूम गावातील बेरोजगारांना सदर रेल्वे स्थानकात नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देण्यात यावे या आपल्या मागणीसाठी २३ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.त्यामुळे अशा प्रकल्प बाधित मार्चेकरांचा अंत न बघता त्या मोर्चेकराच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि गाव परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धुतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी धुतूम गावच्या पोलीस पाटील सुनीता किशोर ठाकूर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here