लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा दिनांक ८ जुलै :– महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन २००८ च्या निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही प्रकल्पात सुरू असलेल्या विविध कामांसाठी स्थानिक बेरोजगार तरुणांनाच कामावर घेण्यात यावे असे स्पष्ट निर्देश असतानाही वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत कंपनी च्या विविध निर्माणाधिण कोळसा खाणीत विविध खाजगी तथा अन्य कंपन्यांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. मात्र यात राज्य शासनाच्या नियमानुसार कारवाई न करता, स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीय कामगारांना संधी मिळत असल्याचे पहावयास मिळते. ही बाब गंभीर असून स्थानिक बेरोजगार तरुणांमध्ये वेकोलीच्या या धोरणांबाबत कमालीचा असंतोष आहे. तेव्हा वेकोलीने आपल्या या कार्यपद्धतीत सुधारणा करून राज्य शासनाच्या जीआर चे पालन करून आपल्या कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या विविध निर्माण प्रकल्पात ८० टक्के स्थानिक बेरोजगार तरुणांनाच रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्या त्या खाजगी प्रकल्पात काम करू इच्छिणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या पात्रतेनुसार त्यांना कामावर घेण्यात यावे
राज्य शासनाच्या आदेशाचे वेकोलीने, तसेच वेकोलि अंतर्गत विविध निर्माण कार्य करणाऱ्या खासगी प्रकल्पाने पालन करणे आवश्यक आहे. यानुसार स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील बेरोजगार युवकांबाबत वेस्टर्न कोल फिल्डच्या बेजबाबदार वृत्ती विरोधात कडक आंदोलन करण्यात येईल. अशा परिस्थितीत जर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे काही नुकसान झाले तर त्याला सर्वस्वी वेकोली व विविध खासगी प्रकल्पाचे स्थानिक अधिकारी स्वतः जबाबदार राहतील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रणय लांडे यांनी वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राचे मुख्यमहाप्रबंधक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रसंगी राजुरा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, सदस्य अशोक राव, आकाश माऊलीकर, नीरज मंडल यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.