नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान

दि 11 /3 /2031 मोहन भारती
कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्यानंतर नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. शेतकऱ्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व बँकांचे कर्ज फेडावे आणि शून्य टक्के व्याजाने पुढचे पीक कर्ज घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या.अद्यापही कोरोनाचे संकट निवळले नाही. परिस्थिती कितीही अवघड असली तरी राज्य सरकार रडगाणे न गाता महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. कोरोनामुळे सेवा क्षेत्राला फटका बसला असला तरी कृषी क्षेत्राने आपल्याला तारले. म्हणूनच अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या योजना या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी असून श्रीमंत घरातील महिलेच्या नावावर घर नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देताना त्याला मर्यादा लावणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच अर्थसंकल्पीय भाषणात देशी ब्रँडेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मुल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति प्रूफ लिटर यापैकी जे अधिक असेल ते करण्यात आले होते. यात दुरुस्ती करुन देशी ब्रँडेड किंवा अन ब्रँडेड न म्हणता सरसकट करवाढ करण्याची दुरुस्ती करण्यात आली.

आता दहा लाखाहून अधिक रकमेच्या ई-निविदा काढणार

देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख रु. वा त्यापेक्षा अधिकच्या रकमेची कामे ई-निविदेद्वारे काढण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, आता तीन लाखांऐवजी दहा लाख रुपये वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कामांच्याच ई-निविदा काढण्यात येतील असे अजित पवार यांनी जाहीर केले.दहा लाख रुपयांखालील कामे ही कोटेशनने केली जातील. आमदारांचा दबाव असूनही फडणवीस हे पारदर्शकतेच्या दृष्टीने त्या निर्णयावर ठाम राहिले होते.

आंबेडकर स्मारक २०२४ पर्यंत

संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळ यांना प्रत्येकी १०० कोटी रुपये या प्रमाणे एकूण ४०० कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा अजित पवार यांनी केली.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मारकासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही. हे स्मारक १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

बालभवनच्या बाजूला मराठी भाषा भवन चर्नी रोड येथील जवाहर बालभवन लगत असलेल्या भूखंडावर भव्य मराठी भाषा भवनाची उभारणी चालू वर्षापासून करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.आधी हे भवन धोबी तलावानजीकच्या रंगभवनच्या जागेवर उभारले जाणार होते, पण त्या इमारतीला हेरिटेजचा दर्जा असल्याने नव्याने काही करता येत नाही.तेथे बाजूला इस्पितळ असल्याने सायलेंट झोन आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *