रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या* *खासदार बाळू धानोरकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी*

 

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

चंद्रपूर : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे हि मागणी केली आहे.

‘रतन टाटा हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय, त्यांचे समाजसेवेचे कार्य देखील अतिशय मोठे आहे.
दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत केली. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठे आव्हान आहे, असेही रतन टाटांनी म्हटले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत याआधीही त्यांना सन २००८ मध्ये पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २००६ मध्ये महाराष्ट्र भूषण आणि २००० मध्ये पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टाटा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले आहे. २८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांच्या जन्म झाला. ते ८४ वर्षांचे आहेत. त्यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नसल्याने दुःख झाल्याची भावना पत्रात खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे त्यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here