By: Shankar Tadas
लोकदर्शन👉
नागपूर, शनिवार, २६ मार्च :- महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाह्नन दिक्षाभूमी येथील सांस्कृतिक सभागृहात इंडियन आंबेडकराइट वूमेन्स फोरमच्याद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महिला परिषद व आंतरराष्ट्रीय गोल्डन महिला पुरस्कार समारोहात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्यां महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना राऊत म्हणालेत की आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने पुढे जात आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्च या संविधानातील तत्वांनुसार मिळालेल्या समान संधीचा पुरेपुर फायदा घेत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
जगात सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानतेचा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिला, असे सांगत २५ डिसेंबर १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून देशातील समस्त स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले, असेही यावेळी म्हणालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या आधारे महिलांनी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन राऊत यांनी केले. माधुरीताई लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रामुख्याने भंते मैत्रेय, मंजुला प्रदीप मॅडम, डॉ अविनाश गावंडे, पुष्पाताई बौद्ध, माधुरीताई लोखंडे, सुषमा कळमकर, भिक्कुनी सूनिती, भिक्कुनी विजया मैत्रेय उपस्थित होते.