*बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज नंदीग्राम एक्सप्रेस व पुणे करिता आठवडयातून ३ दिवस लवकरच रेल्वे धावणार – हंसराज अहीर*
*हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांचे फलित – मध्ये रेल्वे विभागाने विभागीय रेल्वे*
*व्यवस्थापकांकडून मागीतला अहवाल*
चंद्रपूर :- चंद्रपूर येथून मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे नसल्याने जिल्हयातील अनेक विद्यार्थी – पालक व व्यापा-यांना ईतर पर्यायाचा अथवा नागपूर येथून रेल्वे प्रवास सुरू करावा लागत होता. चंद्रपूर येथून मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे असावी अशी विविध स्तरावरून मागणी होत असतांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मागणीची गांभीर्याने दखल घेत दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत थेट बल्लारशा येथून मुंबई व पुणे करिता रेल्वे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून रेल्वे विभागाने हंसराज अहीर यांच्या मागणीचे संदर्भ देत दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी यासंबंधीचे पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर यांना जारी करून रेल्वे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता टिप्पणी (Feasibility remark) सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत.
दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत काझीपेठ पुणे ट्रेन न २२१५१/५२ बल्लारशा येथून सुरू करावी अशी मागणी केली होती. तसेच नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेन नं. ११४०१/०२ ही मुंबई येथून आदिलाबाद पर्यंत येत असतांना या रेल्वेचे विस्तारीकरण करून बल्लारशा पर्यंत सुरू करावी या मागणीसह चर्चा केली. नंदीग्राम या रेल्वे च्या मार्गात भद्रावती, वणी, पिंपळखुटी या ठिकाणी थांबणार आहे. अहीर यांच्या या चर्चेला अनुसरून मध्य रेल्वे विभागाने सदर पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर यांना जारी केले आहे. या पत्रान्वये बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज तर पुणे करिता आठवडयातून ३ दिवस रेल्वे धावणार आहे.
मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून यात्रेकरूंसाठी ही रेल्वे विशेष सुविधेची ठरणारी आहे. याबाबत अधिक माहिती देत हंसराज अहीर यांनी सांगीतले की, सदर रेल्वे गाडया जलद गतीने सुरू करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांच्याशी चर्चा केली असून त्वरीत व्यवहार्यता टिप्पणी मध्य रेल्वे मुंबई कार्यालयास सादर करण्याची सुचना केली आहे. या रेल्वे सुरू होत असतांना चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील प्रवाशी, विद्यार्थी, पालक, व्यापारी व यात्रेकरू यांना भरिव फायदा होणार असून हंसराज अहीर यांचे हे प्रयत्न चंद्रपूर जिल्हयातील रेल्वे सुविधेमध्ये नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा सार्थ विश्वास चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने व्यक्त करून हंसराज अहीर यांचे आभार मानले आहे.