By : Shankar Tadas
वर्धा : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगरपरिषदेने राज्यात पहिल्यांदाचा ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॅायलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतूक होत आहे.
स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गमय परिसरात अगदी 200 स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे.
यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी 2 पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, पुरुषांकरीता करिता 1 मुत्रीघर, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सेनीटरी वेंडींग मशीन या प्रकारच्या अत्याधूनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन हिंगणघाट शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर उपलब्ध असलेल्या आसनावर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली असून शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिध्दी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगर अभियंता श्री.पटेल, कनिष्ठ अभियंता श्री.अली यांनी विशेष सहकार्य केले.
सौजन्य : जिमाका