लोकदर्शन 👉 मोहन भारती
आमदार सुभाष धोटेंचा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा.
राजुरा (ता.प्र) :– राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. विशेषतः राजुरा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग बामणी ते आसिफाबाद, राजुरा ते गोविंदपुर आणि इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शिवाय प्रदुषणाचा नाहक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे क्षेत्रातील नागरिकांची जनभावना व सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, विशेषतः नागरी वर्दळ जास्त असलेल्या भागातील खड्ड्यांची १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी राष्ट्रिय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. अन्यथा राजुरा काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.