*◆आटपाडी येथे डॉ . शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलन नियोजनाची बैठक संपन्न .*
लोकदर्शन आटपाडी (प्रतिनिधी )👉 राहुल खरात
डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित साहित्य संमेलनाचे नेटके नियोजन करून पुढे ही साहित्याची चळवळ चिरंतर टिकण्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे प्रयत्न करू या असे मत माजी आमदार व संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आटपाडी येथे बोलताना व्यक्त केले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरणी येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संमेलनासाठी प्रमुख पाहुणे, चर्चासत्रासाठी वक्ते या बाबी ठरवल्या की पुढील वाटचाल आपणास जलद गतीने करता येईल. त्यासाठी जबाबदारी पार पाडून संबंधितांनी त्याची पूर्तता करावी. संमेलनामध्ये आपल्यातील साहित्यिकांनाही न्याय देऊया. एवढा संमेलनाचा कार्यक्रम घेऊन चालणार नाही, तर डॉ.शंकरराव खरात यांचे स्मारक उभा करून कायम स्वरूपी व्यासपीठ चालवले पाहिजे. ही चळवळ आपणाला सातत्यपूर्ण राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगला पाया उभा करूया, चालता बोलता कार्यक्रम करूया. यासाठी आपण एकत्रितपणे चांगले प्रयत्न करूया व त्यातून आदर्श युनिट तयार करूया, हे सर्वांना प्रेरणादायी ठरेल. संमेलनामध्ये सर्व राजकीय व्यक्तींना एकत्र आणून व श्रोतावर्ग अधिकाधिक यावा यादृष्टीने प्रयत्न करून हे संमेलन यशस्वी करूया. यासाठी ताकदीने प्रसिद्धी देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी ,उद्घाटनाचा मुख्य समारंभ, परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, मनोरंजन, यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
डॉ.शंकरराव खरात यांच्या घरापासून सवाद्य ग्रंथदिंडी सुरू करून शहरातील महात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संमेलनस्थळी दिंडीचा समारोप करण्याचे नियोजन झाले. स्वागत समितीमध्ये सर्व शिक्षण संस्थांचे प्रमुख, तसेच सहकारी संस्था, शिक्षण विभाग, देवस्थान ट्रस्ट, उद्योगपती व अन्य मान्यवरांना सामील करून घेण्याचे ठरले.
जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष ठरविणे, डॉ.शंकरराव खरात यांच्या जीवनावर आधारित व माणदेशातील साहित्य परंपरा या दोन परिसंवादातील व चर्चासत्रातील वक्ते नामवंत, साहित्यिकांची मुलाखत, निमंत्रित व नवोदितांचे कवी संमेलन, राज्य पातळीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम, महिलांचा समावेशक सहभाग, पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठ, पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा गौरव, माणदेशी लेखकांच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन, बाल साहित्याचे व्यासपीठ, कथाकथनाचे नियोजन, संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, व्यासपीठ व साहित्य नगरी नामकरण, संमेलनाचा लोगो, निमंत्रण पत्रे, पुस्तकांचे स्टॉल, काष्ठशिल्प प्रदर्शन, आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी प्रस्ताविक केले व मागील सभेचे अहवाल वाचन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी आभार मानले.
संमेलनासाठी विविध विभागाचे व समित्यांची जबाबदारी उपस्थित काही मान्यवरांवर सोपवून त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
संमेलनासाठी निधी संकलनासाठी प्रारंभ म्हणून आटपाडीचे सादिक खाटीक, कॉन्ट्रॅक्टर विनायक पाटील, विधवा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती लताताई बोराडे, माणहिरा मेडिकल्सचे प्रताप शाहीर जयंत जाधव, गोमेवाडी येथील जीवन सावंत, डॉ . रवी खरात यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयेचा तर आटपाडी येथील अरविंद चांडवले यांनी अडीच हजार रुपयेचा निधी संमेलनासाठी रोखीने दिला. या संमेलनाच्या नियोजनाची तिसरी बैठक पाच जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
डॉ.शंकरराव खरात यांचे चिरंजीव डॉ.रविंद्र खरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे सरचिटणीस अरुण कांबळे इस्लामपूर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते अरुण वाघमारे, डॉ.कृष्णा इंगोले, सुभाष कवडे, डॉ.सयाजीराजे मोकाशी,सुनील दबडे, सिताराम सावंत, शिवाजीराव बंडगर, प्रा.साहेबराव चवरे, विठ्ठल लांडगे, रमेश जावीर, व्ही.एन. देशमुख, विठ्ठल गवळी, वसंत विभुते, सुभाष झोडगे, राहुल वाघमारे, दयानंद सोनकांबळे, संतोष लोणविरे, जोतीराम फडतरे, संजय वाघमारे, संभाजीराव गायकवाड, दिनेश देशमुख, नंदकुमार खरात, रवींद्र लांडगे, प्रा.विजय शिंदे, अरविंद चांडवले ,आप्पा खरात, लक्ष्मणराव खटके, जगन्नाथ खरात, रमेश टकले, कमलेश घोडके, नवनाथ जावीर, सौरभ कदम, साहेबराव चंदनशिवे, प्रा.हेमंत कुलकर्णी,भास्कर बंगाळे, ॲड.मनोज राजवर्धन, दिपक खरात,विजय पवार, महादेव वाघमारे,धनंजय वाघमारे, जीवन सावंत, बाळासाहेब गायकवाड, अशोक पवार,गणपत जाधव, डॉ.कुमार लोंढे, आदि मान्यवर बैठकीला उपस्थित होते.