![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
सव्वाशे कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणे काही सर्वसामान्य गोष्ट नाही. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणे ही सन्मानाची गोष्ट असून, याचे करावे तितके कौतुक कमी. पण मग जगभरातील असंख्य देशांसमोर भारतासाठी पदक मिळवणाऱ्या व्यक्तीची तर थाटामाटात मिरवणूकच काढायला हवी. पण, खरंच असं होतंय का? वलयांकित सेलिब्रिटींच्या घोळक्यातील खेळ आणि खेळाडू वगळता इतर खेळाडूंना अपेक्षित सन्मान आणि प्रशंसा मिळतेय का?
बेलारुस येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘युरोपिअन खुल्या चॅम्पियनशिप’मध्ये ‘आइस स्केटिंग’ स्पर्धेत नित्या रमेश या मुलीने कांस्य पदक पटकावले. तिच्या या कमालीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय तिरंगा पोडिअमवर झळकत होता. उपस्थित मान्यवर कौतुकाने टाळ्यांचा वर्षाव करत होते. पण आपण? आपलं काय?
स्पर्धेनंतर तिरंगी ट्रॅकसुटमध्ये ही वीरांगना बेलारुसहून मायदेशी परतत होती. भारतीय जमिनीवर पाऊल ठेवल्यावर तिच्या स्वागतासाठी फक्त एक ड्रायव्हर सोडला तर कोणीच नव्हते. किती ही दयनीय अवस्था आहे आपली? एखाद्या खेळाडूस फार हारतुरे लागतात असेही नाही. फक्त अंतिम रेषा ओलांडल्यावर पाठीवर शाबासकीची थाप पडली तरीही पुरेशी असते. मैदानाबाहेरुन आपल्या देशवासीयांच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा कानावर पडल्या तरीही ते दुप्पट जोमाने खेळ सादर करतील.
किती अपमानास्पद बाब आहे की या मुलीच्या यशाबद्दल देशामध्ये कुठेच चर्चा होत नाहीये. विमानतळावर वंदना बंगेरा नामक सहप्रवाशाने तिच्याशी संवाद साधला तेव्हा आणि त्यांनी ही कहाणी फेसबुकवर पोस्ट केली. त्यामुळे ही परिस्थिती जगासमोर आली.
सर्व देशवासीयांतर्फे दिलगिरी व्यक्त करत नेटवरतर्फे या कांस्य कुमारीचे त्रिवार अभिनंदन!