लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर : शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ जिल्हा काँग्रेसने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) वाचवण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मनरेगा बचाव राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहर काँग्रेस तसेखर फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी हे संयुक्त आंदोलन पार पाडले.
आंदोलनाची सुरुवात इंदिरा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी नेत्यांनी केंद्र सरकारच्या मनरेगा धोरणांवर तीव्र टीका केली. मनरेगा ही ग्रामीण गरीब, मजूर, शेतमजूर व बेरोजगारांची जीवनरेषा असताना निधी कपात, कामांची मर्यादा व विलंबित मजुरीमुळे लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला.
काँग्रेसने मनरेगासाठी पुरेसा निधी तातडीने उपलब्ध करणे, कामांची संख्या वाढवणे व मजुरी वेळेवर देण्याची मागणी केली. केंद्राने मनरेगा कमकुवत करण्याचे धोरण थांबवावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगळे यांच्यासह सुभाषसिंह गौर, रामू तिवारी, विनोद दत्तयात्रे, प्रवीण पडवेकर, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, बल्लारपूरच्या नगराध्यक्षा डॉ. अल्काताई वाढई व इतर अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.





