By : Shankar Tadas
कोरपना : सध्या रस्त्यावर वेगाने वाहन चालविण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालविल्याने अपघातात वाढ होत आहे. एकीकडे रस्ते गुळगुळीत होत असताना अपघातामुळे वाढलेला मृत्युदर चिंताजनक आहे. युवकांनी वाहतुकीचे नियम पाडल्यास अपघातात घट होऊ शकते असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार यांनी केले.
बामणी-आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या जी.आर. इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीच्या वतीने गडचांदूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार पी.एस. व्हटकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे, प्राचार्या स्मिता चिताडे, प्रकल्प व्यवस्थापक पुनम अर्जापुरे व सुधाकर उपस्थित होते.
यावेळी रस्ता सुरक्षावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक रुचिका आपटे, द्वितीय क्रमांक केसर देवघरे, तृतीय क्रमांक सिद्धांत दुर्गे व प्रोत्साहनपर पुरस्कार अलगद पथाडे, अस्मिता लोहे, फिजा पठाण, मानवी बेसन यांनी पटकाविला. संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले.