भारताची नवी ओळख

दै.महाराष्ट्र टाइम्स (१ऑगस्ट)मध्ये अर्थशास्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांचा “भारताची नवी ओळख” या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला आर्थिक उदारीकरणाची ऐतिहासिक वाट धरल्यानंतर तीन दशके झाली.त्या काळात अनेक गोष्टी घडल्या अनेक राहिल्या.या महत्त्वपूर्ण वाटचालीच्या नाण्याची एक बाजू याच अंकात बँकिंग आणि अर्थशास्राचे अभ्यासक विश्र्वास उटगी यांनी “शोषणव्यवस्था आर्थिक बाजू” या शिर्षकाखाली विशद केली होती.त्याचा सुसूत्र सविस्तर गोषवारा काल १२ऑगस्ट रोजी काढला होता.आज नाण्याची दुसरी बाजू विशद करणार्‍या चंद्रशेखर टिळक (अर्थशास्राचे अभ्यासक)यांच्या लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—*
१९९१ मध्ये अवघ्या काही दिवसांच्या आयातीला पुरेल इतकाच परकीय चलनाचा साठा असणारी भारताची अर्थव्यवस्था होती. त्यावेळी आपल्या विकासाचा दर हा त्याच्या आधीच्या काळातील विकासदराच्या तुलनेतही नीचांकी होता.विदेशी गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न देश करत होता तेव्हा अनेकजण आपल्या भांडवल बाजारातील ट्रेडिंग तथा जुनाट व्यवहार व सेटलमेंट तथा सौदापूर्ती याकडे बोटे दाखवित होती. प्राप्तपरिस्थितीत ३० वर्षापूर्वी, नरसिंह राव व पुढे वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात आर्थिक धोरणात अमुलाग्र बदल घडवले. त्यातूनच राजकीय परिपक्वता व खुली दृष्टी असणारा पंतप्रधान, अर्थमंत्र्याच्या मागे ताकदीने उभा राहिला तर आर्थिक सुधारणा धोरण आणि अंमलबजावणी, कारणमीमांसा आणि परिणाम अशा चौफेर मोजपट्ट्यावर कसे यशस्वी होता येते याची प्रचिती, १९९१ ते २०२१ या ३० वर्षातील अर्थकारण आणि आर्थिक धोरणाचा विचार करताना प्रकर्षाने येते.
जे परकीय गुंतवणूकदार, १९९१ साली गुंतवणूक करण्यासाठी अनंत अटी घालत होते तेच परकीय देश आता गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य देत आहेत.एप्रिल ते जून २०२० या काळात आपला आर्थिक विकासदर उणे २४ टक्के असताना त्याच काळात रिलायन्स समूह त्याच्या रिलायन्स- जिओ प्रकल्पासाठी हजारो कोटींची विदेशी गुंतवणूक मिळवत होता.अशी गुंतवणूक येणे हे एका अर्थाने आर्थिक सुधारणांच्या त्रिदशकपूर्तीचे डौलदार विजयध्वज ठरले आहेत. हे कामगिरी व प्रतिमा या दोन्ही निकषांवर उतरते.आजच्या आपल्या देशाच्या बावन्न- त्रेपन्न हजारी शेअरबाजारामागचे हे गमक आहे.आज आपली अर्थव्यवस्था ६१२ बिलियन डाॅलर्स इतक्या परकीय चलनांच्या गंगाजळीच्या विक्रमी पातळीवर आहे. जागतिक अर्थकारणाच्या क्रमवारीच्या परिघाबाहेर असणारी आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्याच्या त्रिज्येवर नक्कीच आहे.ही जितकी राजकीय फलप्राप्ती आहे तितकीच ती आर्थिक फलप्राप्तीही आहे.आजही कोरोनाच्या अभूतपूर्व आणि आकस्मित दणक्यानंतरही आपल्या विकासाचा,वार्षिक आर्थिक दर १९९०-९१ च्या दरम्यान नोंदवलेल्या दरापेक्षा जास्त सकारात्मक आहे. गेल्या ४२ वर्षात नोंदवला गेला नव्हता इतका वाईट मासिक-त्रैमासिक विकासदर नोंदवला जाऊनही वार्षिक विकासदराची ही पातळी गाठण्याची क्षमता या अर्थव्यवस्थेला या ३० वर्षाच्या सुधारणापूर्वक अर्थकारणाने दिली.विशेषतः आजही आपल्या देशाचा आजचाही विकास दर जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत सरस आहे. सुरक्षितता या निकषांवरही आपण इतरांच्या पुढे आहोत.ट्विन टाॅवर वरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकी शेअरबाजार आठवडाभर बंद होता. १९९२ मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आपला शेअरबाजार दुसर्‍या दिवशी सुरू झाला.करोना काळात अनेक देशांत वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवहारात अडथळे आले.आपल्याकडे तसे एकदाही घडले नाही.
एखादा प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊन तो व्यावसायिक पद्धतीने चालविला जाईल, याची मनोमन खात्री असल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करत नाही.करोना काळात तर मुळीच नाही.अशावेळी भारतीय व्यवसाय क्षेत्र स्वतःविषयी जागतिक पातळीवर स्वतःची अशी समर्थ प्रतिमा उभी करू शकला.अशी प्रतिमा निर्माण करण्याची संधी आणि नंतर सातत्यपूर्ण सवय या ३० वर्षाच्या सुधारणांनी मिळवून दिली आहे.अशा अभूतपूर्व आर्थिक अडचणीत जागतिक गुंतवणुकीचे गंतव्यस्थान मोठ्या प्रमाणावर नेहमीच सोन्यात गुंतवणूक हे असते.तसे या काळातही घडले.त्या खालोखाल आपल्या देशातील विदेशी गुंतवणूक हा त्याचा टप्पा होता. सेवाक्षेत्राचा विस्तार आणि त्यामुळे वाढता प्रभाव हे या तीन दशकातले फलित ठरले आहे.१९४७ साली राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नात सेवाक्षेत्राचा वाटा २ टक्के होता.१९९० चे दशक सुरू होताना हे प्रमाण एकेरी आकड्यात होते.आज ते ५८-५९ टक्के आहे.१९४७ साली सेवाक्षेत्रात ९० टक्के वाटा असणारे बँकिंग व विमा क्षेत्र आता पहिल्या पाचात राहण्यासाठी धडपडताना आढळत आहे.
चीनी सरकारने बीटकाॅइन्स आणि क्रिप्टोकरन्सीबाबत आकस्मित निर्णय घेतला.या निर्णयाच्या दुसर्‍या दिवशी चीनसहित इतर अनेक देशांचे शेअरबाजार कोसळत असताना मात्र आपले निर्देशांक उसळत होते. एकदंरीत १९९१ ते २०२१ या ३० वर्षातील अर्थकारणाचा आणि पर्यायाने आर्थिक धोरणाचा विचार करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे देशाने विविध राजकीय रंगसंगती असणारी सरकारे अनुभवली.पक्ष किंवा आघाडीपरत्वे प्राधान्यक्रमात किंवा योजनांच्या नावात जरूर बदल झाला,पण त्याच्या मूळ दिशेत बदल झाला नाही.घुमजाव तर नाहीच नाही.त्यांतून जन्माला आलेले सेवा क्षेत्राचे प्राबल्य, कल्पना,कौशल्य,कारागिरी,कामगिरी,यांवर आधारित विस्तारीत अर्थकारण आणि त्यातून भारतीय अर्थकारणाचा आगळा वेगळा,नव्हे तीच त्याची ओळख,हे या तीन दशकांचे खरे फलित ठरले आहे. अर्थशास्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून लेखात सोदाहरण केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य,विवेचन- विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय व विचारप्रवर्तक ठरते हे मात्र तितकेच खरे !

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *