by : Shankar Tadas
चंद्रपूर : प्राणीमात्रावर प्रेम करा, दया करा हा संदेश आपण नेहमीच ऐकत असतो. आपण प्रेमाने वागल्यास प्राण्यांना सुद्धा लळा लागतो. आज माणुसकी हरवत चाललेली आहे. मात्र, तिरवंजा येथील भोजराज येरगुडे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या ‘लखन’ बैलाचा तेरवीचा कार्यक्रम मोठ्या धडाक्यात केला व समाजाला पशुवर प्रेम करण्याचा संदेश दिला.
बैलाच्या तेरवीच्या कार्यक्रमाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रकाश साखरे, सुभाष साखरकर, जीवन गौहणे, राकेश शिरगुडे व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सोबत आयुष्यभर काबाडकष्ट करून मातीतून सोनं पिकविणाऱ्या लाडक्या लखनच्या देहाची मृत्यूनंतर विटंबना होऊ नये म्हणून लखनच्या मालकाने भजन मंडळी व बॅन्ड च्या साथीने लखन राजा अमर रहे च्या घोषणेत लखनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. श्रद्धांजली सभा घेतली त्यात अनेकांनी आपल्या शोक संवेदना प्रकट केल्या. भोजराज निरगुडे यांनी आपल्या जिवलग मित्र बद्दल (लखन) शोक संवेदना व्यक्त केली. तब्बल 22 वर्षाची साथ सोडून गेलेल्या लखनच्या स्मृती प्रित्यर्थ ज्या ठिकाणी बैलाला पुरले त्याच ठिकाणी त्याचे मंदिर उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. माणुसकीला पाझर फोडणारी ही घटना भद्रावती तालुक्यातील तीरवंजा या गावी घडली. गावातील भोजराज येरगुडे ने 22 वर्षे आधी वासरू खरेदी केले यांनी या वासरावर जिवापाड प्रेम करीत कुटुंबातील सदस्य प्रमाणेच लहानांचे मोठे केले. केवळ प्रेमच नाही तर काही चांगल्या गोष्टी सुद्धा त्याला शिकविल्या मालकांनी शिकविलेल्या गोष्टी हा वासरू तंतोतंत पाळायचा. मालकाने दिलेला चारा मोठ्या आनंदाने खायचा, इतरत्र चाऱ्याला तोंड सुद्धा लावायचा नाही. अशा जिवलग बैलाच्या वृद्धापकाळाने 15 फेब्रुवारी 2024 ला मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्य गेल्याप्रमाणे तेरवी चा कार्यक्रम 18 फेब्रुवारी 2024 ला आयोजित केला. या कार्यक्रमाला पाहुण्यासह ग्रामस्थांना आमंत्रित केले मात्र मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेऊन येरगुडे कुटुंबीयांनी लखन प्रति दाखविलेले माणुसकी इतरांसाठी ही प्रेरणादायी आणि शेतकरी लखन राजाचे संबंध कसे असावे याची प्रचिती देणारी ठरली आहे.