By : Shankar Tadas
चंद्रपूर : काही मोजकेच शेतकरी नवनवीन प्रयोग करून अधिक नफा कामविण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी जोखीम पत्करून नवीन पीक घेतले जाते. विदर्भातील एका शेतकऱ्याने दुप्पट भाव मिळवून देणाऱ्या पिवळ्या मिरचीचे पीक यशस्वीरित्या घेतलेलं आहे.
तेलंगणा राज्यालगतच्या कोरपना तालुक्यात मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी मिरचीला 20 ते 30 हजार रुपयेपर्यंत क्विंटलला दर मिळाला होता. मोठ्या आशेने मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यंदा प्रचंड वाढली. विपरीत वातावरणाचा फटका मिरची पिकाला बसला. लाखो रुपये खर्चून वाढविलेले पीक रोगाला बळी पडले. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना उभे पीक उपटून काढावे लागले. ज्यांच्या पिकाची स्थिती ठिक आहे त्यांनाही मागील वर्षीच्या तुलनेत अर्धेच उत्पन्न मिळेल. लाल मिरचीला दरही फक्त 10 हजारपर्यंत आहे. खिर्डी येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी तुराणकर यांनी लाल मिरचीसह ‘पिवळी मिरची’ घेतली. त्यांनी एक प्रयोग म्हणून प्रथमच पिवळ्या मिरचीची लागवड करून पाहिली. त्यात ते यशस्वी झाले आहे. गडचांदूर – कोरपना राष्ट्रीय महामार्गालगत लालगुडा हनुमान मूर्तीजवळ अर्धा एकर शेतात असलेल्या पिवळ्या मिरचीला रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. आणि उत्पन्नसुद्धा अपेक्षेप्रमाणे होण्याची शक्यता बालाजी तुराणकर यांनी व्यक्त केली. मार्केट मध्ये आज या मिरचीला 500 रुपये किलो प्रमाणे दर आहे. म्हणजे लाल मिरचीपेक्षा दुप्पट. या मिरचीचा उपयोग सॉस, चाट मसाला यात मोठ्या प्रमाणात होतो. यातील जीवनसत्वेही लाल मिर्चीपेक्षा भिन्न असून चवही वेगळी आहे. उत्पन्न कोणतेही असो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचले तरच शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतो.मात्र पिवळ्या मिरचीबद्दल लोकांना माहिती नसल्याने नागपूर येथील मार्केटमध्ये कमी दराने ही सोन्यासारखी पिवळी मिरची विकणे भाग आहे. तरीही अधिक नफा देणारे एक नवीन पीक म्हणून पिवळी मिरचीची सर्वत्र चर्चा होत आहे.
#Yellowchily #vidarbhafarmer #korpanachandrapur