लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
प्रेम हे ठरवून होत नाही. कधी कुणाच्या प्रेमात पडावं हे आपल्या हातात नसतंच मुळी. लग्नाच्या गाठी सुद्धा स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हंटले जाते. लग्न करताना एकमेकांना साजेसे वधू वर शोधून विवाह केला जातो.
लग्न ठरवताना वय हा महत्त्वाचा घटक मानला जातो. साधारण ३ ते ५ वर्ष वयाचा फरक हा सामान्य मानला जातो. तसेच मुली पेक्षा वयाने मोठा मुलगा वर म्हणून निवडला जातो.
परंतु जेंव्हा दोघांच्या वयामध्ये १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अंतर असेल तर अशा लग्न सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावतात. तसेच मुलगी ही मुलापेक्षा अधिक वयाची असेल तर लोकांच्या पचनी पडत नाही.
असे लग्न टिकणार नाहीत किंवा घटस्फोटाची शक्यता अधिक आहे असा सर्वसाधारण समज असतो. मुलगा मुली मध्ये वयाचे खूप अंतर असेल तर सामाजिक नापसंती दर्शवली जाते. त्यामुळे वर आणि वधू वरील दबाव वाढून शकतो.
वयाने मोठ्या सैफ बरोबर लग्न करण्याच्या करीनाच्या निर्णयावर अनेकांनी वेगवेगळी मते मांडली. तर दहा वर्षे मोठ्या असलेल्या प्रियांका चोप्राने निक जोनस बरोबर लग्न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशा- विदेशात अनेक चर्चांना उधाण आले..
काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले तर काहींनी टीका केली. जोडीदाराच्या वयातील असलेल्या अंतरामुळे कधीकधी काही समस्या होऊ शकतात. पण जोडीदाराच्या वयातील फरकामुळे होणारे फायदे याबद्दल तुम्हाला माहीत का? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जोडीदाराच्या वयातील अंतर असण्याचे फायदे.
१. आर्थिक स्थैर्य :
वयाने मोठ्या असलेल्या पार्टनरला आर्थिक स्थिरता प्राप्त झालेली असते. आर्थिक स्थैर्य या विवाहाच्या महत्त्वपूर्ण पैलूचे निराकरण होत असल्याने संसार सुरू करताना तुम्ही सुखी आणि समाधानी असता. आर्थिक विवंचेतून होणारे वादविवाद टाळले जातात.
२. परिपक्वता :
मोठ्या जोडीदाराने तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य पाहिले असल्याने, ते आयुष्यातील बहुतेक कठीण प्रसंग तसेच परिस्थिती हाताळण्यास समर्थ असतात.
नातेसंबंधातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी ते अधिक परिपक्व असतात. वेळप्रसंगी तुमच्या चुका पोटात घालून ते तुम्हाला समजून घेतात.
३. भिन्न दृष्टिकोन
दोन्ही पती-पत्नी वेगवेगळ्या वेळी लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांच्या जीवनात भिन्न दृष्टीकोन असतो. त्यामुळे नवीन कल्पना समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी त्यांना एकमेकांची मदत होते. दोन पिढीतील मतांतरे समजून घेऊन तोडगा काढू शकतात.
४. उत्तम संतुलन :
वयाने मोठा जोडीदार निवृत्त झाल्यानंतर वयाने लहान जोडीदार कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेऊ शकतो. तसेच उतरत्या वयात एका जोडीदाराची काळजी घेण्यासाठी दुसरा जोडीदार शारीरिक तसेच मानसिकरित्या सज्ज असतो.
नातेसंंबंधांमध्ये वय किती महत्त्वाचे??
एखाद्या नात्याचे यश हे जोडीदारांचा एकमेकांवरील विश्वास, प्रेम यावर अवलंबून असतो. त्यांच्यातील समानतेचा धागा एकमेकांना बांधून ठेवतो.
वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देणे तसेच नात्यातील बांधिलकी, विश्वास आणि जवळीक वाढवणे; आणि आलेल्या समस्या विचारपूर्वक सोडवणे हे घटक कोणत्याही नात्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि या घटकांचा वयाशी फारसा संबंध नाही. त्यामुळे वयाचे अंतर हे नातेसंंबंध टिकवताना अडसर ठरत नाही.
त्यामुळे वास्तविकता अशी आहे की, वयातील अंतर जोडप्यांसाठी काही आव्हाने आणू शकते परंतु जोपर्यंत एखादे जोडपे त्यांच्या नातेसंबंधात काम करण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्या नात्यासाठी वयाचा कोणताही अडथळा नसावा.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.