लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर (प्रतिनिधी): माणिकगढ सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक) मार्फत शेतजमिनींचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी आज राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात धक्कादायक घटना घडली. कुसुंबी, नोकारी आणि बांबेझरी येथील पाच शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याने परिसरात खळबळ उडाली.
लच्चू चिन्नू आत्राम, जयराम जंगु कुळमेथे, जंगा सोमा पेंदोर, बालाजी नागो शिडाम आणि मारोती तारलू तलांडे या शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. प्रशासनाने तात्काळ दक्षता घेत सर्वांना प्रथम राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नियोजित दौरा थांबवून आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने चंद्रपूर गाठले आणि रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्येकाची प्रकृती जाणून घेतली तसेच नातेवाईकांशी संवाद साधत धीर दिला.
सध्या सर्व शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
या भेटीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे तसेच नोकारीचे उपसरपंच वामन तुराणकर उपस्थित होते.
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





