गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने निबंध स्पर्धा

By : Shankar Tadas

गडचिरोली : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने,गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी केले आहे.
निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर प्राप्त झालेले निबंध विचारात घेतले जाणार नाही. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता प्रोत्साहित करावे.

हे आहेत निबंधाचे विषय:
1.जगद्गुरु संत तुकारामाच्या साहित्यातील सामाजिकता, 2. जगद्गुरु संत तुकारामाचे व्यक्तिमत्व: अभंगगाथा, 3. जगद्गुरु संत तुकारामाचे वारकरी संप्रदायात योगदान, 4. जगद्गुरु संत तुकाराम काल, आज आणि उद्या हे निबंधाचे विषय असून विद्यार्थ्यांनी वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा.

बक्षिसाचे स्वरूप:
प्रथम क्रमांक रु. 4 हजार रोख व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रु. 3 हजार रोख व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रु. 2 हजार रोख व प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून तीन निबंधांना तुकारामगाथा व प्रमाणपत्र भेट दिल्या जाईल.

निबंध स्पर्धेचे सर्वसाधारण निकष:
निबंधातील आशय संपन्नता, अद्ययावतता, सामाजिक बांधिलकी, वैचारिक मांडणी, तर्कशुद्धता, भाषाशैली व परिणामकारकता तसेच प्रमाणलेखन हे स्पर्धेचे सर्वसाधारण निकष आहेत. संत तुकारामाचे समाज निरीक्षण, चिंतनशीलता याचे प्रतिबिंब असावे, निबंधाच्या शेवटी संदर्भग्रंथ सूची असावी. मुद्देसूदपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निबंधात अपेक्षित आहे.
गोंडवाना विद्यापीठातंर्गत शिक्षण घेत असलेले पदवी व पदव्युत्तर पदवीचे सर्व विद्यार्थी तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

निबंधाची शब्द मर्यादा 3 हजार शब्दपर्यंत असावी. निबंधाचे माध्यम मराठी असावे. निबंध महाविद्यालयातील प्राचार्याने प्रमाणित केलेला असावा. निबंध सुवाच्च हस्ताक्षरात व सुस्पष्ट भाषेत असावा. निबंधासोबत प्राचार्याने साक्षांकित केलेले एक स्व-परिचय पत्र पाठविणे अनिवार्य आहे. निबंध गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम अध्यासन केंद्रात दि. 25 एप्रिल 2024 पर्यंत पोस्टाने किंवा स्वतः पोहोचवावा. 25 एप्रिल 2024 नंतर येणारा कोणताही निबंध स्वीकारला जाणार नाही. 25 एप्रिलनंतर सात दिवसाच्या आत स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले जाईल. अधिक माहितीकरिता अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे (8928254983) यांच्याशी संपर्क साधावा. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी कळविले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *