‘श्री क्षेत्र धाबा’ला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा मान; धार्मिक उन्नतीचा नवा अध्याय – मुनगंटीवार-भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश
लोकदर्शन 👉मोहन भारती
धाबा, ता. गोंडपिपरी दिनांक 17एप्रिल
धाबा येथील श्री संत परमहंस कोंडया महाराज देवस्थानाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देत तसेच देवस्थानाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार देवराव भोंगळे यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य सत्कार सोहळा १५ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अमर बोडलावार, दीपक सातपुते, किशोर अगस्ती, सुहास माडुरवार, विजय देशमुख, राजा चिलमंतवार, बबनराव पत्तीवार, राकेश पून, स्वप्निल अनमुलवार, इंद्रपाल घुळसे, निलेश पुलगमकर, सौ. वैष्णवी बोडलावार, नंदाताई घोगरे, अरुणाताई जांभूळकर, अश्विनीताई तोडासे, स्वातीताई वडपल्लीवार, बाबुराव बोमकंठीवार, भानेश थेगेवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री क्षेत्र धाबाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. “धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे केवळ सुविधा निर्माण करणे नसून, समाजाला अध्यात्मिक बळ देणे आहे. या कार्यातून मिळणारे आत्मिक समाधान हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे,” असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी केलेल्या उपक्रमांचा उल्लेख करत, शिखर शिंगणापूर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृह, तुळशी वृंदावन उद्यान, श्रीशैलम येथील ध्यानमंदिर आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक निर्णय आणि उपक्रमांमुळे मिळालेल्या समाधानाचाही त्यांनी उल्लेख केला.
आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या तीर्थक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू.”
या उपक्रमामुळे धाबा तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या भागातील धार्मिक पर्यटन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.





