(लोकदर्शन न्यूज गडचांदूर👉मोहन भारती
गडचांदूर | आगामी गडचांदूर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल घडवणारी घडामोड घडली आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भक्कम युतीची घोषणा केली आहे.
ही युती 15 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान प्रकाश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी प्रा. हितेश मडावी, पूर्व विदर्भ सामना समन्वयक. दिव्यकुमार बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष व गडचांदूर निरीक्षक रूपचंद निमगडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर उराडे, जिल्हा महासचिव धनराज चांदेकर, तसेच कोरपणा तालुका सल्लागार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
युतीची घोषणा होताच गडचांदूर शहरात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत सत्तांतराचे स्पष्ट संकेत या महायुतीतून दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने रंगत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश तावडे यांनी “गडचांदूरच्या सर्वांगीण विकासासाठी ही युती निर्णायक ठरणार असून सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे” असे ठाम प्रतिपादन केले.
दरम्यान, “तिन्ही आघाडीची एन्ट्री ही नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या बदलाची चाहूल आहे” असे निरीक्षण व्यक्त करत आशादायी टिप्पणी दिव्यकुमार बोरकर यांनी केली.
गडचांदूरच्या राजकारणात ही युती नेमका कोणता बदल घडवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





