By : प्रा. राजकुमार मुसणे
कलेप्रतीचा आदर व प्रसंगपरत्वे नियतीच्या कठोरतेमुळे बदलत गेलेल्या विचित्र स्थितीला सामोरे जात जीवन जगणाऱ्या नृत्य व गायक कलावंतांच्या उत्कट प्रेमाभिव्यक्तीचे नाटक म्हणजेच संगीत ‘सजना मी डाव जिंकला’ हे नाटक होय. कलाभिरुची, प्रांजळ प्रेम, परिस्थितीशरणतेचे व विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारे , प्रेमाचे ,यशाचे दुःखाचे दर्शन घडविणारे ‘सजना मी डाव जिंकला ‘ हे नाटक आहे.
झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसा प्रस्तुत ,सिनेस्टार शेखर पटले निर्मित – दिग्दर्शित , अमरकुमार मसराम लिखित , संगीत ‘सजना मी डाव जिंकला ‘नाटकाचा प्रयोग अंतरगावकर नाट्य कला मंडळाच्या वतीने ७ एप्रिल २०२५ ला अंतरगाव जि.चंद्रपूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. गायक कलावंत व नृत्य कलावंत यांच्यातील प्रांजळ प्रेमाभिव्यक्ती उत्कटपणे मांडणारी नाट्यकथा संगीत ‘सजना मी डाव जिंकला’ या तीन अंकी नाटकातील पंधरा प्रवेशातून उलगडते.’सजना मी डाव जिंकला’ हे नाटक प्रांजळ अन् अस्सल प्रेमाचे , कटकारस्थान, छळ व अत्याचाराचे आहे . श्यामच्या प्रेमामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग व उद्भवलेल्या स्थितीचे निदर्शन नाटकातून होते.शिवाय कलावंतांची उपेक्षाही नाटकातून प्रकर्षाने प्रत्ययास येते.
श्रीमंत आप्पासाहेब पाटलांचा मुलगा श्याम हा गायनात सरस आहे. नृत्यकलेत निपुण असलेल्या नयना या कोटीवर वास्तव्यास असलेल्या नर्तिकेवर प्रेम करतो. नयना सुद्धा श्यामच्या गायनावर फिदा होते. नर्तकीचे दुःख ,तळमळ, शोषण, तिच्या समस्या,यातना ,तिचे अनाथपण यामुळे संवेदनशील श्याम अंतर्मुखपणे विचाराने आस्था वृद्धींगत होते.
शिवाय प्रेक्षकही नयनाच्या आपबीतीने अचंबित होतात. एकूण परिस्थिती पाहता नयनविषयी त्याला आत्मीयता वाटते. तिचे दुःख, तिच्या व्यथा, तिच्या वेदना, तिचे हाल पाहून श्याम तिच्याकडे आकर्षित होतो. प्रेमात अखंड बुडालेल्या श्यामकडे पाहून वडिलाला मात्र त्याचा प्रचंड राग येतो. श्रीमंत घराण्याची इज्जत गेली, अविचारीपणे केलेल्या या कृत्याने तोंडाला काळे फासले. कोटीवर असणाऱ्या वेशेच्या प्रेमात पडून आपली प्रतिष्ठा धुळीस मिळविल्याचे शल्य त्यांना अस्वस्थ करते. आप्पासाहेब श्यामला वारंवार अपमानास्पद बोलून त्याची प्रतारणा करतात. अप्पासाहेबांच्या मित्राचा मुलगा राज हा मात्र वडिलांसोबत केलेल्या गद्दारीच्या पूर्ववैमनस्याचा वचपा काढण्यासाठी श्यामविषयी आप्पासाहेबांना वारंवार भडकवतो. राजला नयन हवी असल्यामुळे तो जुहीलाही आपल्या कटात सामील करून घेतो. अप्पासाहेब मोठा मुलगा भाईला श्यामला समजाविण्यास सांगतात. भाई श्यामचे नयनवरील अस्सीम प्रेम व त्याची उद्विग्नता पाहून आईने दिलेला कुंकवाचा करंडा आणतो आणि नयनला कुंकू लावण्यास श्यामला सांगतो. वारंवारआपला मुलगा श्याम आपले ऐकत नाही किंबहुना नर्तकीच्या प्रेमात गुरफटून तो तिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर श्यामला आप्पासाहेब घराबाहेर हाकलतात. स्वाभिमानी श्याम ऐश्वर्यसंपन्नतेचा त्याग करीत नयनला सोबत घेऊन अडचणींना सामोरे जात कष्टमय संघर्षाने आपला संसार थाटतो. घरी जेवणासाठी साधे अन्नही नसणे अशा दारिद्र्याची झुंज देतात.परंतु विकृती मानसिकतेच्या राज आणि चांडाळ चौकडीची राणी यांच्या कटकारस्थानाचा बळी ठरतो. नयनचा दहा हजारात चांडाळ चौकडी राणीकडे सौदा करतो तर शामला परत आणण्याकरिता आप्पासाहेब एक लाख रुपये देऊ करतात. किंबहुना आप्पासाहेब नयनलाही पैशाची लालूच दाखवून शामला घरी परत आणण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु नयन मात्र धनाची लालच कवडीमोलाची ठरवत लाथाडते. आप्पासाहेबांनी संपत्तीच्या लालशेतून श्यामवर प्रेम करत असल्याचा आरोप केल्यानंतर मात्र नयन चिडते. श्यामला आपलं खोटं प्रेम असल्याचे निक्षून सांगते. राणीच्या सांगण्यावरून आपण हे नाटक करत असल्याचे सांगून स्वतः एक वेश्या असल्याची कबुली देते. घर सोडून जाण्याची परवानगी मागतील किंवा मात्र श्यामच्या स्वप्नांचा चुराडा केल्याचे शल्य श्यामला अस्वस्थ करते. आईने दिलेले मंगळसूत्र श्याम नयनला परत मागतो .कुंकू लावले तेव्हा स्वतःला व मनालाही तुझ्या स्वाधीन केल्याचे श्याम स्पष्ट करतो. अशा विमनस्क स्थितीत बाप झाल्याचा आनंदही त्याला होतो. त्यातही गायनाचा शो मिळाल्याचा आनंदही होतो. परंतु हा आनंद अल्पस्वरूपी ठरतो. राज भालूला दारूच्या बाटल्या श्यामच्या घरी ठेवण्यास सांगतो इन्स्पेक्टर घराची झडती घेतात आणि अवैध व्यवसाय करीत असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक होते. गायनाचा शो ही थांबतो आणि हा दैवाचा विपरीत खेळ होत जातो. नयनची प्रकृती बिघडते तिला रक्ताच्या उलट्या होतात वेदनाने विव्ह ळणारी नयन श्यामची प्रतीक्षा करते आणि शेवटी प्राणत्याग करते. राज आणि राणी चाकुने हाणामारी होते.राजकडून भालू पिस्तूल खिचून घेतो आणि आपण सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत सर्व प्रकरणाचा छडा लावतो.
अपघाताने अनाथ झालेली अन् कोटीवाल्या राणीच्या हाती लागल्याने नृत्य व वेश्या व्यवसायाने पुरुषांची वासना शमविण्यासाठी आपला जन्म झाल्याचे शल्य कायम बोचणारी, धनाला कवडीमोल ठरवत माणुसकी महत्त्वाची मानणारी, ध्येयाच्या यज्ञकुंडात आहुती देण्यात खूप मोठे सामर्थ्य समजणारी नयना दीपाली भराडे हिचा बिनधास्त आणि प्रभावी अभिनय, नियतीने आयुष्य भरडल्यामुळे विकृतीचा शिरगाव झाल्याने दैवाचा सूड उगवण्याकरिता कित्येक मुलींना आयुष्यातून उठवणारी , जग्गूदादाच्या कोटीवर वेश्या व्यवसायात गुरफटलेली, मर्द होके भी रँडी का जिने जगणारी ,कोटी मालकीण चांडाळ चौकटीची राणी उर्फ शाकाल अर्थात महाराणी (सिनेस्टार शेखर पटले), पैशाच्या बळावर काहीही करता येते असा श्रीमंतीचा माज असलेला पैसे के लिए रात सजाने वाली औरत अशी नर्तिकेची निर्भत्सना करणारा, श्यामला दुष्कृत्यात अडकवणारा, गरिबांचे रक्त पिणारा शोषक प्रवृत्तीचा ,कटकारस्थानी, खलप्रवृत्तीचा राज( प्रफुल्ल मेश्राम) , ऐश्वर्या संपन्नतेमुळे चाकोरीबध्द जीवन जगणारा, पत्नीच्या निधनानंतर मुलांवर मायेचे पांघरून घालत संगोपन करणारा आणि मुलांवर आपले विचार लादणारा आप्पासाहेब (गौतम ढेंगळे), विचारी ,सालस ,प्रांजळ प्रवृत्तीचा भाई (अमर कुमार मसराम), गायनात विशेष रुची असून त्यात करिअर करू पाहणारा ,प्रेमवेडा, नयन एक स्त्री आहे असा उदात्त विचार करणारा संवेदनशील वृत्तीचा श्याम (शुभम मसराम), विनोदीवृत्तीचा कविराज (हर्षल राऊत), वेषातराने कटाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नरत विनोदी प्रवृत्तीचा भालू (एम. के. जादूगर), जुली (मिस काजल ),रेशमा (मिस सोनल ) या कलावंतांच्या क्रिया प्रतिक्रियातून साकारलेले नाट्यपुष्प म्हणजेच सजना मी डाव जिंकला होय.नाटकातील संवादही विलक्षण आहेत .ध्येयाच्या यज्ञकुंडात आहुती देण्यात खूप मोठे सामर्थ्य आहे. जीवाला जीव देणारी माणसं गरिबीतच जन्माला येतात. अशा भारदस्त संवादामुळे नाट्याशय परिणामकारकपणे व्यक्त झाला.
हर्षल राऊत व एम के जादूगर यांच्या विविध हास्योत्पादक पंचमुळे नाटकात विनोदनिर्मिती झाल्याने प्रेक्षक खुर्चीला खिळून राहिला. हेडलाईट ,टिल्लूपंप ,नांगरफाळ ,डोके दाबणे ,पाय दाबणे, सेवा करणे, बॅटरी चार्जिंग ,धान कापणे, भारे बांधणे ,स्टॅमिना यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण शब्द उच्चारामुळे प्रेक्षागृहात हशा पिकतो.
‘सजना मे डाव जिंकला’ या नाटकातील गीतेही श्रवणीय व नाट्याशय अभिव्यक्त करणारी आहेत .
‘काया माझी बहरून आली ,या गालावर चढली लाली, जवळी घ्या ना मला, सजना मी डाव जिंकला’
‘तुझं रूप पाहुनी सजने गेले मन मोहुंनी, तू आहे ग लाखात देखणी’ तुझ्या आणि माझ्या संसाराची गाठ बांधली या जन्माची सखी जीव ओवाळीला तुझ्यावरी’,’शब्द शब्द ऐकता सूर जुळले, सुरातुनी माझे तुला प्रेम कळले”मन भरलं ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला जरा लावशील का तुझ अंग माझ्या अंगाला ‘करू जगावर राज आपण गाजली प्रेम कहाणी ‘
यासारख्या वैविध्यपूर्ण, बहारदार, नाट्याशय व्यक्त करणारी सुश्राव्य गीतांनी व स्वरबहार शुभम मसराम यांच्या सुरेख गायनाने, रेवा बुल्ले यांची तबला वादन स्वरबहार ,पार्श्वगायक सचिन कोरासे यांचे प्रसंगानुरूप अप्रतिम आर्गनवादन व पुण्यशील कोचे यांचे ॲक्टोपॅड वादन यांच्या संगीतसाथीमुळे नाट्य प्रयोगात रंगत आणली.
नाटककार अमरकुमार मसराम यांचे उत्तम संवाद लेखन, श्यामचे नयनवरील अस्सल प्रेम, नयनची अगतिकता, राणीचे सस्पेन्स, पूर्व आयुष्य, आप्पासाहेबांची तगमग, रजनीकांत व भालूचे सहकार्य,नयन आणि राणी यांच्यातील जत्रेतील प्रसंग व विलक्षण नाते उलगडण्याकरिता व प्रेमाचा, दुःखाचा डाव कोण जिंकतो हे कळण्यासाठी’ सजना मी डाव जिंकला’ हे नाटक पाहायलाच हवे.
वेगवेगळ्या संचातील कलावंतांमुळे नाट्यप्रयोगात घटना – प्रसंगनिर्मिती व सादरीकरणाची पक्कड सैल झाली असली तरी मात्र सिनेस्टार शेखर पटले यांचा कोटीवालीचा वैशिष्ट्यपूर्ण लकबीचा अफलातून अभिनय, दीपाली भराडे यांच्या अंगिक अभिनयातून बेचैन, अस्वस्थता प्रकतीच करणारी व स्वरबहार शुभम मसराम यांच्या सुश्राव्य गीतगायन व अभिनयाच्या जमेच्या बाजूमुळे नाट्यप्रयोग उत्तम झाला.
प्रा.राजकुमार मुसणे, गडचिरोली