लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गॉडपिपरी हे तालुके डोंगराळ, अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुके असून अनेक गावे तालुका मुख्यालयापासून दुरवर वसलेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना तालुक्याचे ठिकाणी शासकिय कामकाज व शिक्षणाकरिता ये – जा करावे लागते मात्र राजुरा आगारात बसेसची कमतरता असल्याने आगार प्रमुखांना नियोजन करणे कठीण जात आहे. अनेक गावांमध्ये बस सेवा उपलब्ध नसल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. गोर गरीब पालकांना खाजगी वाहनाने प्रवास करून आपल्या मुला बाळांचे शिक्षण पूर्ण करणे कठीण जात आहे. परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात बस सेवेची मागणी होत आहे.
राजुरा आगारातील ६० पैकी ४० बसेस अतिशय जुन्या झालेल्या असून पहाडी भागात प्रवाशी घेवून जात असताना चालक व वाहक यांची फार मोठी कसरत होत असते, प्रवाशांना आपला जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. राजुरा आगारात BS-6 च्या फक्त १० बसेस उपलब्ध असून त्या बसेस लांब पल्यावर चालत असल्याने ग्रामीण भागाकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार राजुरा आगार (जिल्हा चंद्रपूर) येथे BS-6 नविन बनवातीच्या २० बसेस तातडीने उपलब्ध करून देणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी, आणि या कार्यवाही बाबतचा अहवाल मला अवगत करून द्यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्य, मार्ग परीवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.