लोकदर्शन 👉| मोहन भारती
चंद्रपूर : शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे चंद्रपूरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सत्ताधारी भाजपचे दोन आमदार आपापली ताकद दाखवण्यासाठी आमनेसामने स्वागत पंडाल उभारून बसले होते. परिणामी पोलिस यंत्रणा या दोन मंचांभोवतीच फिरत राहिली, तर सर्वसामान्य गणेशभक्तांच्या सुरक्षेकडे व सोयी-सुविधेकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे— दोन दिवसांपूर्वीच तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेला कुख्यात गुंड माजी मंत्र्यांच्या स्वागत मंचावर विराजमान असल्याचे समोर आले. जिल्हा पोलीस अधीक्षक, अॅडिशनल एसपी, डीवायएसपी यांच्यासह मोठी पोलीस फौज घटनास्थळी उपस्थित असतानाही या गुंडावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. ते म्हणाले –
“गणेशोत्सव हा पवित्र उत्सव आहे. तो शांततेत व गालबोट न लागता पार पडावा, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय स्पर्धेत अडकून सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्याहून गंभीर बाब म्हणजे, तडीपारीचा गुंड आमदारांच्या छत्रछायेखाली मंचावर बसला. हे कायदा व सुव्यवस्थेसाठी धोक्याचे लक्षण आहे.”
धोटे यांनी पुढे सांगितले की, भाजप आमदारांच्या आमनेसामने उभारलेल्या मंचांमुळे संपूर्ण विसर्जन व्यवस्थापन कोलमडले. वाहतूक कोंडी, गोंधळ व गर्दी हाताळण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. परिणामी मध्यरात्रीपर्यंत अनेक गणेशमूर्ती विसर्जनाची वाट पाहत राहिल्या, तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “चंद्रपूरची कायदा-सुव्यवस्था राजकीय गटबाजीच्या विळख्यात अडकली आहे” अशी तीव्र चर्चा शहरभर सुरू आहे.



