लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण, दि. २१ (विठ्ठल ममताबादे): उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजप नेते महेश बालदी यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन उरण–नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या सुरू असलेल्या ४० फेऱ्यांऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
यामुळे उरण–नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि वेळेवर होईल, असा विश्वास आमदार महेशशेठ बालदी यांनी व्यक्त केला.
बैठकीत केवळ फेऱ्या वाढविण्याबाबतच नव्हे, तर प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजा यावर लवकरच ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि रेल्वे सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल,” असे आमदार बालदी यांनी नमूद केले.