गडचांदूर शहरात नाल्यांची दुरवस्था; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर — सध्या गडचांदूर शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यामुळे शहरातील नाल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचे पाणी मुख्य नालीमध्ये मिसळले जाते. मात्र, महामार्ग प्रकल्पांतर्गत मुख्य नालीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सर्व नाल्यांचे पाणी साचून नाल्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे.

या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात डास व अन्य कीटकांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. विशेष म्हणजे, या नाल्यांमधील सडलेले पाणी भूगर्भात मिसळून गडचांदूर येथील हातपंप आणि विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. परिणामी, नागरिकांना उलट्या, जुलाब, ताप यांसारख्या पाणीजन्य आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्गाचे संथ काम जबाबदार

शहरातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून मुख्य नालीचे काम प्रलंबित असून त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांची मागणी

शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे व महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने मुख्य नालीचे काम पूर्ण करण्याची आणि सर्व कोंडलेल्या नाल्यांची सफाई करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here