लोकदर्शन गडचांदुर 👉शिवाजी सेलोकर
गडचांदुर – शहरातील नागरिक सध्या नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यात गढूळपणा व दुर्गंधी जाणवत असून, अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
नगर परिषदेकडून पाणी शुद्धीकरण प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर रंगाचे, गढूळ व चिखलयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यधोक्याचा सामना करावा लागत असून, काही ठिकाणी पाण्यामुळे पोटदुखी, उलट्या यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत.
या संदर्भात अनेक वेळा नगर परिषदेला लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
–