गडचांदुरात प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती संपन्न

लोकदर्शन गडचांदूर 👉अशोककुमार भगत

गडचांदूर येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नुकतीच प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीचे आयोजन पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभे चे तालुकाध्यक्ष बौद्धचार्या श्रावण जीवने होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आशाताई सोंडवले, बौद्धचार्य उत्तमराव परेकर, शिला राहुल निरंजने उपस्थित होते.

सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे नाव केवळ एक शक्तिशाली सम्राट म्हणूनच नव्हे, तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यासाठीही कायम स्मरणात राहील. मौर्य साम्राज्याचा हा तिसरा सम्राट सुरुवातीला युद्धप्रिय आणि विजेता म्हणून ओळखला जात होता, परंतु कलिंग युद्धानंतर त्याच्या जीवनात आलेला बदल आणि बौद्ध धर्माचा स्वीकार यामुळे त्यांची खरी ओळख निर्माण झाल्याचे प्रमुख अतिथी आशाताई सोनडवले यांनी यावेळी प्रतिपादन केले.

अशोकाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक युद्धे लढली, परंतु कलिंग युद्ध (इ.स.पू. २६१) हा त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. या युद्धात झालेली प्रचंड हानी, रक्तपात आणि मानवी दुःख पाहून अशोकाचे मन हादरले. लाखो लोकांचा मृत्यू आणि विध्वंस पाहून त्याला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप झाला. याच वेळी त्याची भेट बौद्ध भिक्खू उपगुप्त यांच्याशी झाली, ज्यांनी त्याला बुद्धांच्या शांततामय आणि करुणामय शिकवणींची ओळख करून दिली. या घटनेनंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या सेवेसाठी आणि धर्माच्या प्रसारासाठी समर्पित केल्याचे अध्यक्ष बौद्धाचार्य श्रावण जीवने यांनी अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केले.
भारताच्या राष्ट्रीय चिन्हात असलेला अशोक चक्र हा त्याच्या धम्म आणि शांततेच्या विचारांचे प्रतीक आहे. सम्राट अशोक हे एक युद्धवीरापासून शांतिदूत बनले आणि त्यांनी बौद्ध धर्माला नवे जीवन दिले. त्यांचे कार्य केवळ इतिहासातच नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या हृदयात अहिंसा आणि करुणेचा संदेश रुजवणारे असल्याचे राहुल निरंजने यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनाबाई बडोले यांनी केले. तर प्रा माधुरी उके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यशस्वीतेसासाठी सविता वाघमारे, ज्योसना तोडे, शिला निरंजने, मंगला ताकसांडे, करुणा धोटे, मीरा खैरे, सुनिता वाघमारे, रीमा खैरे, शामला ताकसांडे, सुनिता वनकर, सक्षम खैरे, भारत ताकसांडे, पंचमदास वाघमारे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here