लोकदर्शन गडचांदूर.👉.(अशोककुमर भगत)
गडचांदूर शहरातील
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी १ ते १५ जानेवारी वाचन पंधरवडा राबविण्यात आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दि. १३ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन आणि सामुहिक वाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक विठ्ठलराव थिपे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी सांगितले की, वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून राज्यातील वाचनसंस्कृतीला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अलीकडच्या काळात तरुण वर्ग हा वाचन संकृतीपासून दुरावत चाललेला आहे. त्यामुळे तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल. ‘वाचाल तर वाचाल’ या सूत्राप्रमाणे युवांमधील विविध उपक्रमशीलतेला मोठा वाव मिळू शकतो, असा आशावाद प्राचार्य देव यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ विजया गेडाम यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या आहारी न जाता ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथच आपल्या जीवनाला खरा आकार देतात. आपल्या व्यक्तिमत्व विकासाला प्रेरणा देण्याचे काम ग्रंथ करीत असल्याचे त्यांनी विषद केले. चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अनुताई दहेगावकर यांनीही यावेळी समयोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महाविद्यायाचे ग्रंथपाल मनोहर बांद्रे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. अनिस खान, डॉ अजयकुमार शर्मा, डॉ उत्कर्ष मून, डॉ. संदीप घोडीले, प्रा. रामकृष्ण पटले, प्रा चेतन वैद्य, प्रा पवन चटारे, प्रा. चेतन वानखडे,प्रशासकीवय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





