लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर : श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव बाल-सुसंस्कार शिबिराला काल मान्यवरांनी भेट देत शिबिरातील बालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आजच्या आधुनिक व डिजिटल युगात लहान मुलांवर योग्य वयात चांगले संस्कार होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत, महात्मा गांधी विद्यालयात सुरू असलेले हे बाल-सुसंस्कार शिबिर मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे सांगितले. राष्ट्रसंतांचे विचार व संस्कार आत्मसात करूनच ही बालके उद्याचे आदर्श नागरिक बनतील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
यावेळी गुरुकुंज आश्रम मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणदास गमे, जिल्हा प्रचारप्रमुख रूपलाल कावळे, शिबिराचे मुख्य आयोजक किन्नाके महाराज, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्मिता चिताडे, शिबिर प्रमुख गणेश बोबडे, प्रेमलाल पारधी, देवराव ठावरी, दीपक वर्भे, कविता येनूरकर यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





