By : Shankar Tadas
राजुरा :
वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राजुरा मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ५३ नवीन हातपंप (विंधन विहिर) बसवण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळा लागला की अनेक गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. राजुरा विधानसभेतील अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी खालावत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका होता. अनेक ठिकाणी हातपंप नादुरुस्त होते किंवा पाण्याची पातळी खाली गेल्याने बंद पडले होते. नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की येऊ नये म्हणून या समस्येची गांभीर्याने दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी फेब्रुवारी महिन्यातच विधानसभेतील प्रत्येक तालुक्यात आढावा बैठका घेऊन संबंधित यंत्रणेनी टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून तेथील गरजेनुसार नवीन हातपंपांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच त्यानंतर स्वतः पत्रव्यवहार व पाठपुरावा ही केला. त्यांच्या याच प्रयत्नांना यश आले असून राजुरा विधानसभेतील राजुरा तालुक्यात २० कोरपना तालुक्यात ०९ तर गोंडपिपरी तालुक्यात २४अशा एकुण ५३ हातपंपांच्या मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत जिवती तालुक्यातही टंचाईग्रस्त गावांना नवीन हातपंप मंजूर होणार आहेत.
आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ५३ गावांना मिळालेले हे हातपंप पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांसाठी सक्रिय राहून पाठपुरावा केल्यास प्रश्न मार्गी लागू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.





