लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण, दि. २४ (विठ्ठल ममताबादे) :
शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रकल्पग्रस्त आणि गोरगरिबांच्या न्यायहक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक आंदोलनात पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले. आज त्यांच्या १२व्या स्मृतिदिनी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सरकारला सुबुद्धी सुचेल का, असा रोखठोक सवाल आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी उपस्थित केला.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले असून, महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. “दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे, तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये,” असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता जासई येथे दि. बा. पाटील यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महेंद्रशेठ घरत यांनी अभिवादन केले. यानंतर पनवेल येथील संग्राम बंगला येथे दि.बा. पाटील यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या वेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
सरकारने दि. बा. पाटील यांच्या योगदानाचा सन्मान करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.