लोकदर्शन गडचांदुर.👉..अशोककुमार भगत
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी आमदारांसमोर एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक मागणी मांडली.
प्रा. दुधगवळी म्हणाले, बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च तीर्थस्थान असलेल्या बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या पवित्र स्थळाचे प्रशासन अद्याप बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथे आजही ब्राह्मण पुजारी धार्मिक विधी पार पाडत असून, ही बाब देश विदेशातील बौद्ध समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे जागतिक वारसा स्थळ बौद्ध भिक्षू व बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे आणि सध्या कार्यरत असलेल्या ब्राह्मण पुजाऱ्यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात यावे.
त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे विनंती केली की, या मागणीसाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्र विधानसभेत हे विधेयक मांडावे.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. दुधगवळी यांनी सांगितले की, हा लढा केवळ बौद्ध समाजाचा नसून, तो ऐतिहासिक न्यायाचा आहे. बौद्ध स्थळांवर बौद्धांचाच अधिकार असावा, ही गोष्ट फक्त भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावरही भूषणावह ठरणारी आहे. यावेळी जयंती उत्सव समितीचे सचिन कांबळे, प्रा. प्रशांत खैरे, के. एन. सोनडवले, देविदास मुन, रवि ताकसांडे, प्रेम वानखेडे, सुभाष सिरटकर, प्रा. रोशन मेश्राम, शैलेश लोखंडे, रवि पथाडे, विश्वास विहिरे,अशोककुमार भगत, महेंद्र ताकसांडे, प्रा. करमणकर, मारोती लोखंडे, विक्की मुन, समाधान सोनकांबळे, नितीन भगत, पद्माकर खैरे, देवानंद मुन सह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.