दुसऱ्यातील चांगलेपणा आपल्याला समृद्ध करू शकतो : स्वामी राघवेंद्रानंदजी : गोंडवाना विद्यापीठात युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राचे उद्घाटन

By : Mohan Bharti

गडचिरोली : जीवनात यशस्वी होण्यासाठी अंतःकरणाचे पावित्र्य मनाचा संयम आणि कार्यातील दीर्घोउद्योग अत्यंत आवश्यक आहे आपली कुपमंडूकप्रवृत्ती टाकून उदार मनाने दुसऱ्यातील चांगले गुण घेण्याची मानसिकता आपल्याला समृद्ध करू शकते असे प्रतिपादन नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंदजी यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख वक्ते व उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे होते. पुढे बोलताना स्वामी राघवेंद्रनंदजी म्हणाले स्वामी विवेकानंदाचे लेखन वाचल्यानंतर असे वाटते की ते थेट आपल्याशी बोलत आहेत. प्रत्येक जीव हा दिव्य आहे आणि प्रत्येकाने एकमेव कर्तव्य म्हणजे त्यांचे दिव्यत्व प्राप्त करणे होय. सत्य एक आहे ते फक्त वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते. स्वामीजींनी तरुणांना एकाग्रतेने शिकण्याचे महत्व सांगितले आहे. विचार आणि कृतीचे स्वातंत्र्य हे विद्वत्तेचे वैशिष्ट्य असून तरुणांना अशी पावले उचलण्याचे आव्हान त्यांनी केले. उद्घाटनानंतर राधिका क्रिएशन निर्मित स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर करण्यात आले
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्राचार्य दिनकर वाकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार,डॉ. संजय गोरे तसेच व्यवस्थापन परिषदेचे आणि सीनेट सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्रा. विकास पूनसे यांनी तर आभार केंद्र समन्वयक डॉ. अपर्णा भाके यांनी मानले.यावेळी केंद्राच्या वतीने बोधचिन्ह तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली त्यातील विजेते भोजराज सातपुते,वैशाली धोंडरे आणि उत्कर्ष नागापुरे यांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here