लोकदर्शन.👉 मोहन भारती
राजुरा.२३जुलै :– केंद्रातील एनडीए सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारा दिशाहीन आणि निराशाजनक अर्थसंकल्प आहे. यात महाराष्ट्राच्या विशेषतः विदर्भातील सर्व सामान्य जनतेच्या पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. बिहार, आंध्र प्रदेश ला झुकते माप दिले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, देशात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, खुंटलेला औद्योगिक विकास यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ाच्या औद्योगिक आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नवीन योजना, प्रकल्पांसाठी कुठलेही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. केंद्र सरकारने दुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्हाच्या विकासाला चालना देण्याऐवजी त्याला ब्रेक लावून मेट्रो सिटींकडेच निधी वडता केला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प दिशाहीन आणि सर्वसामान्य जनतेसाठी निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.